सोलापूर दि.२६:- भारतीय जनता मोठ्या आशेने देशाचा विकास होईल या भ्रमात भाजप सरकारला एकहाती सत्ता दिली. यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ हि घोषणा देऊन जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रवित्रा घेतला आणि या घटनेला आजमितीस ७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ७ वर्षाच्या कालावधीत आपला देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा विक्रम मोदी सरकारने केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले.
राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि महागाईत वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव तिप्पट झालेले आहे. कृत्रिम साठेबाजीला अप्रत्यक्ष खतपाणी घातले जात आहे. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण कोरोनाचा धोका दिसत असताना सुद्धा या ठोस अमलबजावणी न करता कामात ढिलाई दाखविल्यामुळे आज देश याचे फळ भोगत आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात २६ मे हा दिवस निषेध दिन आणि देशव्यापी काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार केलेला होता. त्या अनुषंगाने सोलापुरातही २५ हजार कामगार काळे वस्त्र, काळे फिती, काळे झेंडे आपल्या घरावर लावून तीव्र निषेध व्यक्त केल्याचे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बुधवार दि. २६ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारने राबवत असलेले जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने जिल्हा सचिव कॉ. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सत्तेचा निषेध दिवस पाळण्यात आला. यावेळी निषेध पत्रक दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर नगरसेविका कामिनिताई आडम, नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला, सलीम मुल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, अकिल शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कॉ. अनिल वासम यांनी केले.


















