सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्ती सत्काराच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले होते. सुभाष बापूंचा शुक्रवारी मूड वेगळाच होता, तिऱ्हे गावात सीना नदीवर ब्रिज कम बंधार्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमात नाव न घेता माजी आमदार दिलीप मालकांवर मनसोक्त तोंडसुख घेतले, आणि केवळ अर्ध्या तासानंतर त्याच दिलीप मानें सोबत एका सांय दैनिकाच्या प्रकाशनाला एकमेकांना चिटकून फोटो काढला, पुढे काही वेळाने ते काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत दुसऱ्या व्यासपीठावर दिसले. तिथे तर त्यांनी कहरच केला
सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत. बापाचं वय झालं की पोराला वाटतं, आत बापाचं काय ऐकायचं. पण, बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, असे सांगत दिल्लीमध्ये कुणाचं सरकार आहे पाहू नये, मात्र तुमच्या शब्दाला वजन आहे, मला बाप म्हणून सांगा हे काम माझं राहिलं आहे, त्याचा पाठपुरावा कर मी सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेन अशा शब्दांत भाजप आमदार सुभाष देशमुखांनी शिंदे साहेबांचा गौरव केला. बापूंच हे कोड्यात बोलणं आमदार ताईंना डिवचण्याचा उद्देश होता का?अशी चर्चा ही आता राजकिय वर्तुळात होऊ लागली आहे.
सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी बोरामणी विमानतळ प्रस्तावित केले त्याची जमीन संपादित झाली आहे मात्र त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अद्यापही काम केंद्राचा निधी न मिळाल्याने सुरू झालेले नाही. 2014 ते 2019 पर्यंत तत्कालीन खासदाराने कोणताही प्रयत्न केला नाही सध्याच्या खासदाराला तर सोलापूरच्या विकासाचे काहीही घेणेदेणे नसल्याचं दिसून येतय.
आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्री म्हणून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने या खात्याचा कारभार दिला आहे. खरेतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि सोलापूरचे शिंदे कुटुंबीय यांचा कौटुंबिक नात आहे, सुशीलकुमार शिंदे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांगितल्यास सोलापूरच्या बोरामणी विमानतळाचे काम झटक्यात मार्गी लागू शकते मात्र भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि राज्यातील ज्येष्ठ नेता म्हणून जर सुभाष बापू देशमुख यांनी राजकारण बाजूला ठेवून सोलापूरच्या विकासाचा दृष्टिकोन पाहिला आणि या विषयाचा जर केंद्र स्तरावर पाठपुरावा केला तर निश्चितच येत्या काही दिवसात बोरामणी विमानतळाचा थांबलेला विषय मार्गी लागेल, आणि चिमणीवरून जुन्या विमानतळाचे जे राजकारण सुरू आहे ते नक्कीच थांबेल यात शंका नाही.


















