मंगळवेढा-( प्रतिनिधी ) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा निकाल हा भाजपचे उमेदवार माननीय श्री समाधान दादा आवताडे यांनी जवळपास ३७३३ मताने आघाडी घेऊन निवडणूक जिंकल्याचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहे. याला पंधरा दिवस उलटून गेले असून आता त्यातील काही पराभूत उमेदवार एकत्र येऊन तक्रार करतात की,ईएमव्ही मशीन मध्ये घोटाळा असून ‘फेर मतमोजणी घ्यावी’ अशी मागणी म्हणजे रडीचा डाव असून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे म्हटल्या प्रमाणे आहे.
पराभूत झालेले उमेदवार फारच निराश झालेले यावरून स्पष्ट होते. कांही पराभूत उमेदवारांना जास्त अंतराने निवडणूक हारले तर त्याचे काय वाटत नाही परंतु निसटता पराभव असेल तर मात्र फारच बेचैन वाटतं. तो पराभव पचवणे फार कठीण होते, तसे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवाराचे झाल्याचे दिसून येते. दुसऱ्या एका पराभूत उमेदवाराने मशीनमध्ये घोटाळा असल्याचे आक्षेप घेतला आहे. ज्या चित्रावर बटन दाबले की ते चित्र, त्या मतदाराला स्पष्ट दिसत होते. त्यामध्ये जर वेगळा प्रकार असता तर त्याच वेळी त्या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असती. तोही एखादा प्रकार उघडकीस आलेला नाही. यातील बरेच उमेदवार निवडणूक लढवलेले उमेदवार असल्याने, याबाबतीत अनुभव असलेले उमेदवार आहेत. आकडेवारीत कांही गडबड असेल तर, त्याच वेळी म्हणजे निवडणूक निवडून आलेल्या उमेदवाराला, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर, निवडणूक उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांनी लेखी आक्षेप नोंदवला असेल तर फेर मतमोजणीची प्रक्रिया राबवली जाते.
मागील काळात ही असे प्रकार बरेच घडलेले आहेत. उदा. करमाळा विधानसभा २०१४ ची निवडणूक, नारायण आबा पाटील विरुद्ध रश्मीताई बागल. सांगोला विधानसभा १९९५ मध्ये गणपतराव देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील, बार्शी विधानसभा मतदारसंघातही राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल, यांचे मध्ये ही अगदी चारशे ते पाचशे मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती, त्या वेळीही असेच आक्षेप घेण्याचे प्रकार घडलेले होते.
लग्नसोहळा पार पाडून सर्व विधी कार्यक्रम उरकला आहे आणि वधूने ‘वर’ पसंत नाही, असे म्हटल्यासारखे आहे. निवडून आलेल्या उमेदवाराचा विधानभवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. लेखी सर्टिफिकेट हातात मिळाले आहे. याला काही दिवस उलटले आहेत.आणि पराभूत उमेदवार एकत्र येऊन, आता फेर मतमोजणी ची मागणी करीत असल्याचे दिसून येते, म्हणजे कांहीतरी ‘रडीचा डाव’ खेळायचा म्हणून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे म्हटल्यासारखेच आहे, असे त्या म्हणाल्या.