सोलापूर : दहावी आणि बारावीच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र ,उत्पन्न प्रमाणपत्र व क्रिमीलेअर प्रमाणपत्र मागणीसाठी नागरिकांची होणारी गर्दी व त्यांना वेळेमध्ये सदरचे प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच महा ई सेवा केंद्रामध्ये त्यांनी द्यावयाच्या सेवा योग्य पद्धतीने उपलब्ध होत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मे आणि जून महिन्यामध्ये प्रशासनावर दाखल्यांच्या निर्गतीच्या कामकाजाचे दडपण असले तरीही नागरिकांनी सुलभपणे आणि वेळेमध्ये दाखले मिळावेत व शाळा कॉलेजमधील प्रवेशांमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत याकरिता सोलापूर शहरातील नागरिकांकरिता उत्तर सोलापूर तहसीलदार यांच्यामार्फत शहरात मध्यवर्ती ठिकाणी नोर्थकोट प्रशालेत १८ मे पासून १० दिवस महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असुन एका दिवसात दाख़ला निर्गमित करण्यासाठी बारा काउंटर लावण्यात येणार आहे.
सदर बारा काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्स कार्यरत असतील .त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील चार नायब तहसीलदार चार अव्वलकारकून ,पाच सर्कल ऑफ़िसर ,पाच लिपिक , सहा तलाठी, दहा कोतवाल व चार ऑपरेटर अशी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आठवडाभर मध्यवर्ती ठिकाणी हा सर्व सेटअप कार्यरत ठेवला जाणार आहे . या सर्व कामावर तहसीलदार उत्तर सोलापूर हे स्वतः लक्ष ठेवणार असून नागरिकांना दाखल्यांच्या अनुषंगाने असणाऱ्या सुविधा वेळेत मिळतील याबाबत आवश्यक ती दक्षता ते घेतील.
दाखले आवश्यक असण्याच्या या कालावधीमध्ये ज्या महा-ई-सेवा केंद्राकडून शासनाने विहित केलेल्या शुल्का पेक्षा अधिक पैशांची मागणी केली जाईल अथवा जाणीवपूर्वक नागरिकांची अडवणूक केली जाईल अशा महा-ई-सेवा केंद्रांची वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती घेऊन त्याची पडताळणी करून आवश्यकता भासल्यास संबंधितांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा सर्व महा-ई-सेवा केंद्र चालकांना देण्यात आला आहे . शासनाने महा-ई-सेवा केंद्र ही सुविधा दाखल्यांच्या कामाचे अधिकाधिक विकेंद्रीकरण करून नागरिकांना सुलभपणे व सहजपणे दाखले मिळावेत याकरिता निर्माण करण्यात आलेली आहेत तथापि महा-ई-सेवा केंद्रांनी या उद्दिष्टाचे पूर्तता न करता नागरिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशी महा-ई-सेवा केंद्र कायमस्वरूपी त्यांच्यावर कारवाई करून बंद करणे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणे आणि गंभीर स्वरूपाच्या अनियमित्ताने चुकांसाठी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे अशी कार्यवाही संबंधितांवरती करण्यात येईल .
शहरातील सेतू केंद्र बंद केल्यामुळे दाखल्यांच्या कामकाजावरती विपरीत परिणाम झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त होत आहेत तथापि मागील वर्षी सन 2022-23 मध्ये एक मे ते 15 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रे सुरू असताना निर्गत केलेल्या दाखल्यांची संख्या व सन 2023-24 या वर्षांमध्ये एकमे ते 15 मे या कालावधीमध्ये सेतू केंद्र बंद असताना निर्गत झालेल्या दाखल्यांची संख्या पाहता सेतू केंद्र बंद झाल्यामुळे निर्गत झालेल्या दाखल्यांच्या संख्येमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसून तहसील कार्यालयांच्या पातळीवरती व महा-ई-सेवा कार्यालयाच्या पातळीवरती दाखल यांची निर्गती करण्याचे काम नियमितपणे सुरू आहे . तथापि दाखल्यांची वाढती मागणी तसेच शाळा आणि कॉलेज प्रवेशांच्या अनुषंगाने कमी राहिलेला कालावधी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाने मध्यवर्ती ठिकाणी अनेक सेटअप लावून नागरिकांना कमी कालावधीत तात्काळ दाखले देण्याच्या अनुषंगाने नियोजन केले आहे .
शहर परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने व तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे . तसेच तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र व सर्व तहसील कार्यालयातील दाखल्या देण्यासाठी संबंधित असलेले कर्मचारी व अधिकारी यांनाही अशाच पद्धतीने अतिरिक्त स्वरूपाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत..

















