मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. राज्यातील शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आपण सर्वांनी मिळून गावं वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगत आता यापुढे कोरोनामुक्त गाव हे अभियान राबविणार अशी घोषणा केली, यासह मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे व अंत्रोळी ही दोन गावे कोरोनामुक्त झाल्याने त्यागावच्या सरपंचांचे कौतूक केले,
खरे तर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संकल्पनेतून पुढे आलेली माझे गाव, कोरोनामुक्त गाव हे अभियान डिसेंबर 2020 मध्येच जिल्ह्यात राबवले आहे,
या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाबद्दल सर्व साधारण जन जागरण, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रीय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जतूकीकरण मोहीम राबविणे या पंचसुत्रीवर अधारित असलेली “माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने राबविले गेले.
हे अभियान लोकाभिमुख होण्यासाठी गाव पातळीवर गावातील शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन- सदस्य यांच्या उपास्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली, आरोग्य शिक्षण व प्रतिज्ञा देण्यात आली.























