“सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाने मान्यता दिली आहे, त्यानुसार महापालिकेचे आयुक्त यांना शहरातील निर्बंध याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी दर पाहिला तर तो फारच कमी आहे मात्र राज्यामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे आज शनिवारी निर्णय घेऊ शकतात दुसरीकडे सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्ह दर व बेडची संख्या पाहता तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात आले आहे”
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत.
आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हे हे स्तर एकमध्ये होते. याशिवाय आठ जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते. आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगर, नाशिक, उस्मानाबाद, सांगली, बीड, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, गडचिरोली, ठाणे, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील.राज्यात स्तर दोन आणि पाचमध्ये एकही जिल्हा नाही. स्तर चारमध्ये रायगड, रत्नागिरी व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
तिसऱ्या स्तरात अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दुपारी ४ पर्यंत खुली ठेवता येतील. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकेल.
तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. वीकेंडला हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्या वेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. मॉल्स, थिएटर, मल्टिफ्लेक्स बंद राहतील.
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकाने ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. निकष बदलले आतापर्यंत पॉझिटिव्हिटी रेट काढण्यास सर्व प्रकारच्या चाचण्यांची संख्या गृहीत धरली जात होती. आता फक्त आरटीपीसीआर चाचण्यांचीच आकडेवारी बघितली जाईल.


















