सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास धरण 100 टक्के भरणार आहे, सध्या 96 टक्के भरले असून
गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने 3 दिवसांत 6 टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. त्यामुळे धरणातील वाढ कूर्मगतीने सुरू आहे. उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाण्याचा वापर काटकसरीने केला जाईल, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी स्पष्ट केले.
रविवारी सकाळी उजनीतील पाणी साठा 96.04 टक्के आहे, तर आवक दौंड येथे 4 हजार 623 क्यूसेक्स आहे. बंडगार्डन (पुणे) येथे केवळ 2 हजार 916 क्यूसेक्स आवक असून उपयुक्त पाणी साठा 51.45 टीएमसी इतका झाला आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत धरणावर मुसळधार पाऊस झाल्यान धरणात 6 टक्केची भर पडली आहे. तर गेल्या 15 दिवसात जेमतेम 13 टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला असून धरणात पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी धरणाने 96 टक्के ची पातळी ओलांडून 96.04 टक्के ची मजल मारली आहे. हा महत्वाचा टप्पा गाठला असून तीन दिवसांत 100 टक्के कधी होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा जोर प. महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे.



















