“कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी शेतकर्यांच्या समृध्दीसाठी आणि कल्याणासाठी मोठ्या परिश्रमाने स्थापन केलेल्या श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक इच्छुकांनी स्वयंस्फूर्तीने माघार घेतली. त्यामुळे कारखान्यावरील पडणारा लाखो रुपयांचा बोजा टळला. शिवाय महाराष्ट्रात निवडणूक बिनविरोध करून एक नवा आदर्श निर्माण केला. तेव्हा बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व इच्छुकांचे आणि कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे मनपूर्वक आभार”.धर्मराज काडादी
सोलापूर- संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक अखेर संगमेश काडादी यांच्या मनधरणी नंतर रात्री उशिरा बिनविरोध झाली काडादी कुटुंबियातील अंतर्गत वाद या निवडणुकीच्या माध्यमातून मिटल्याचे दिसून आलं. हे वाद मिटवण्यासाठी मागील तीन दिवसांपासून बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, सिद्धाराम चाकोते, किणीचे अशोक पाटील, महादेव पाटील, मल्लिनाथ सोलापुरे, प्रभुराज मैंदर्गिकर गणेश चिंचोळी, हे प्रयत्न करत होते माजी जिल्हा परिषद सभापती आप्पाराव कोरे यांनी सुद्धा शेवटच्या क्षणी प्रयत्न केले.
ही निवडणूक बिनविरोध झाल्याने कारखान्याने महाराष्ट्रात बिनविरोधचा नवा आदर्श निर्माण केला आहे. संचालक मंडळात विद्यमान आठ संचालकांचा समावेश आहे.
सर्वसाधारण मतदारसंघात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह गुरुराज माळगे (दर्शनाळ), सिध्दाराम चाकोते (सोलापूर), शिवशंकर बिराजदार (कुंभारी), अमर पाटील (बरूर), सुरेश झळकी (शेगाव) हे सहा विद्यमान संचालक याशिवाय राजशेखर पाटील (कोरवली), अशोक पाटील (किणी), विलासराव पाटील (चुंगी), अरुण लातुरे (सोलापूर), मल्लिकार्जुन ऊर्फ प्रमोद बिराजदार (निंबर्गी), विद्यासागर मुलगे (वडकबाळ), शंकर पाटील (गौडगांव), सिध्दाराम व्हनमाने (कुसूर), शिवानंद पाटील (कुडल) हे बिनविरोध निवडून आले.
संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी हे विद्यमान संचालक बिनविरोध निवडून आले.
महिला मतदारसंघात मंगला काडादी (देगाव) आणि श्रीदेवी माशाळे (बोरामणी) यांची बिनविरोध निवड झाली.
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात मलप्पा चांभार (तोळणूर) या विद्यमान संचालकांसह काशीनाथ कोडते (कलकर्जाळ) हे बिनविरोध निवडून आले.
कारखान्याच्या 20 जागांसाठी 117 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. परंतु 97 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. त्यात विद्यमान उपाध्यक्ष अॅड. दीपक आलुरे, संगमेश्वर काडादी, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, शिवाजी इंगळे, सुधीर लांडे, श्रीशैल वाले आदी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य केले.
सोमवारी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सर्व 20 उमेदवारांची नावे जाहीर केली.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे समजताच काडादी यांच्या ‘गंगा’ या निवासस्थानी सभासदांनी तसेच कार्यक्षेत्रातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून जल्लोष केला. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचा निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सभासदांनी अपूर्व उत्साहात शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. त्यानंतर सर्व नूतन संचालकांनी ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, रतिकांत पाटील, शिवशरण बिराजदार तसेच अप्पासाहेब पाटील- वडकबाळकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.
कारखान्याची निवडणूक यापूर्वी 2006 मध्ये बिनविरोध झाली होती. त्यानंतर आता 15 वर्षानंतर अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली.
शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी आमचे थोरले बंधू धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे संगमेश्वर काडादी यांनी ‘गंगा निवास’ येथे छोट्याशा सत्काराप्रसंगी सांगितले.

















