सोलापूर : महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.विजय भीमाशंकर पनशेट्टी वय 32 वर्ष,रा,हतुरे वस्ती,सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेने हतुरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे कारण विजय पनशेट्टीला चार वर्षाचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केली होती. आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. महावितमध्ये ड्युटी करत मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहून आजूबाजूचे शेजारी विजयचं कौतुक करत होते.पण आता विजय पनशेट्टी गणेश विसर्जना दरम्यान मृत झाल्याने चार वर्षीय मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे.
सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विजय पनशेट्टीने आपल्या मित्रांसोबत विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.विजय पनशेट्टी हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता.9 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता.गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला.रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही.पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.
विजय पनशेट्टी हा महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता.सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती.त्याने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केले होते.पत्नी, एक मुलगा,दोन भाऊ,आई वडील असा परिवार होता.कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.तेव्हापासून विजय मानसिक तणावात होता,पण चार वर्षीय मुलाने विजयचे सर्व मानसिक ताण हलके केले होते.गेल्या दोन वर्षांपासून विजय आई वडील,व मुलगा हतुरे वस्ती येथे राहत होते.ड्युटी करून मुलाचा सांभाळ करण्यात तो नेहमी व्यस्त असायचा.पण गणेश विसर्जनादरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने चार वर्षीय मुलगा पोरका झाला.आता या मुलाचा सांभाळ कसा आणि कोण करणार असा प्रश्न पडला आहे.त्याचा मृतदेह घरी आल्यावर हतुरे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चार वर्षीय मुलाला पाहून सर्व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
हतुरे वस्ती परिसरातील ती विहीर शापित असल्याची माहिती नागरिक देत होते.या विहिरीत नेहमी कोणीतरी आत्महत्या करत आहेत. स्थानिक प्रशासनाने विहिर बंद करावी अशी मागणी करत आहेत.कारण ज्यावेळी विजय पनशेट्टीचा विहिरीत बुडाला तो आतील गाळमध्ये अडकला होता.त्याच्या मृतदेहासोबत गाळ,पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात बाहेर आला होता.विजयच्या मृत्यूची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.



















