सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका ; जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्य अपात्र ; बापरे एका गावात तर…
सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे. त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले आहे. त्यामध्ये अंजली चव्हाण, नूरजहा हुसेन शेख, तेजश्री संजय गायकवाड, शांताबाई नागनाथ कांबळे, बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे.
माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे. या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. सोनाली पांडुरंग माने, रोहिदास दादासाहेब गायकवाड, नेताजी नामदेव चमरे, संगीता धनंजय पाटोळे, चंचला विजय पाटील, प्रीतम अक्षय पाटील, दिपाली तानाजी गायकवाड यांचा समावेश आहे.
बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा सतीश कोतमीरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन भीमराव साळुंखे व अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा दिलीप माळी, माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन चिंतू माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले आहे.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कल्याण गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव (ह) लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे.