मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ता योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाने एका ठिकाणासाठी मंजूर केलेला पाणंद रस्ता प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी बांधण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून, हा प्रकार केवळ प्रशासकीय अनियमितता नसून शासन निधीच्या संभाव्य गैरवापराचा गंभीर प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मौजे सुलेरजवळगे येथे सन २०२५-२६ मध्ये “सुलेरजवळगे ते कणबस रस्त्यापर्यंत मातोश्री पाणंद रस्ता (०/०० ते १/००)” या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मंजुरीतील ठिकाणी काम न करता सुलेरजवळगे ते शिरवळ रस्त्याच्या मध्यभागीच काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारात संबंधित कंत्राटदार, रोजगार सेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी संगनमत करून मंजुरीचाच मार्ग बदलल्याचा गंभीर दावा निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे मंजूर योजनेचा मूळ उद्देशच धुळीस मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून, ज्या शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता मंजूर झाला ते लाभार्थी आजही सुविधेपासून वंचित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मंजुरी आदेश आणि शासन नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यात आल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच शासन निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत . चौकशीनंतरच या आरोपांचे सत्य स्पष्ट होणार आहे.
याबाबतचा निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना देण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य उत्तम वाघमारे शिवयोगी स्वामी माजी तंटामुक्त अध्यक्ष विजयकुमार पाटील नागनाथ खुणे आदी उपस्थित होते
















