सोलापूर : 16 एप्रिल रोजी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी 13 साधकांचा मृत्यू झाला. या घटनेला संपूर्ण जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत काँग्रेसच्या आमदार तथा राज्याच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आणि या घटनेवर दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशीही मागणी पत्रकार परिषदेत केली.
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव अलका राठोड, नरसिंह आसादे, मनिष गडदे, मेकाले गुरुजी, सातलिंग शटगार, तिरुपती परकीपंडला यांची उपस्थिती होती.
शिंदे म्हणाल्या, खारघर घटनेला संपुर्ण जबाबदार सरकार आहे, परंतू याचे खापर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर फोडले जात आहे. आप्पासाहेबांबद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहे, परंतु राज्य सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, घटना घडून इतके दिवस झाले पण सरकार काहीच बोलत नाही लाज वाटत नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना? अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रम सुरू असताना लोक मरत होती, ॲम्ब्युलन्स जात होत्या, तरीही घटनेचे गांभीर्य सरकारला लक्षात आले नाही. कार्यक्रम सुरूच ठेवला, जर या लोकांसाठी शासनाने सर्व सुविधा केल्या होत्याच तर लोकं मरण कशी पावली? यामागची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठीच काँग्रेस पक्षाने या विषयावर दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन या प्रकरणाची चर्चा घडवून आणावी अशी मागणी केली आहे.


















