सोलापूर : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे कार्यकर्त्यांचा श्वास आहेत.त्यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा मागे घेऊन आजीवन अध्यक्षपदी रहावे असे साकडे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांकडून घालण्यात आले. निवृत्तीचा निर्णय न बदलल्यास प्रदेश आणि शहर स्तरावरील सर्वच पदाधिकारी सामुहिक राजिनामा देतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. प्रदेश सचिव संतोष पवार, ज्येष्ठ नेते जनार्दन कारमपुरी,मनोहर सपाटे, महेश गादेकर, शंकर पाटील, नाना काळे, विद्या लोलगे, डाॅ.बसवराज बगले, दिनेश शिंदे, तौफिक शेख, डाॅ.रोटे, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, कार्याध्यक्षा लता ढेरे, लता फुटाणे, शशिकला कस्पटे, बिस्मिल्ला शिकलगार, सुनिता गायकवाड, सायरा शेख, अमीर शेख, गफूर शेख, नुरोददीन मुल्ला, चंद्रकांत पवार, मुसा अत्तार, किरण मोहिते, सावळे, निंगप्पा तळे आदि प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सर्वच मान्यवरांनी पक्षाचे संस्थापक शरद पवारांच्या निर्णयाने देशाला धक्का बसला आहे अशी खंत व्यक्त केली.त्यांच्यामुळेच लाखो नेते आणि कार्यकर्ते घडले आहेत.देशाच्या विविध क्षेत्राची प्रगती झाली आहे. लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले आहे. राजकारणातील सर्वच पक्षांचे ते आदर्श आहेत.त्यांच्या नेतृत्वाचे छत्र नसल्यास राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निरुत्साही होईल,त्यामुळे पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी असे साकडे घातले.
आपल्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती मागे न घेतल्यास शहरातील अध्यक्षासह सगळेच पदाधिकारी आणि प्रदेश प्रतिनिधी सामुहिक राजिनामा देतील,असा एकमुखी ठराव करून प्रदेश कार्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.


















