सोलापूर : राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद सदस्यांच्या मुदत संपून एक वर्ष होऊन गेले, प्रशासक किती दिवस राहणार? निवडणुका कधी लागणार आहेत असा प्रश्न पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सोलापुरात विचारला, तेव्हा त्यांनी त्याचं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले.
बावनकुळे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषद दरम्यान महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक यांचा विषय निघाला एक वर्ष झाले भाजप शिवसेनेचे सरकार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का लागत नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, जोपर्यंत लोकसंख्येची जनगणना होत नाही त्यानंतरच त्या आधारावर महापालिका जिल्हा परिषदेच्या जागा वाढवता येतील. परंतु मागील अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी सर्व जागा जिंकतील या आशेने जागा वाढवल्या. नंतर भाजप शिवसेनेचे सरकार आले त्यांनी राष्ट्रवादीच्या चुकीच्या निर्णयाला रद्द ठरवत जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही तरच जागा वाढवाव्या असा निर्णय घेतला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात चॅलेंज केले आहे. राष्ट्रवादीने न्यायालयातील याचिका माघार घ्यावी त्यांच्याच चुकीमुळे या निवडणुका होत नाहीत, हे जनतेने लक्षात घ्यावे अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.





















