राज्याचे राज्यपाल यांना सोलापूर शहरातील मनपा सत्ता अधिकारी भाजपाचे महापौर सभागृह नेते पदाधिकारी व माजी मंत्री यांनी भेटून सोलापुरातील विकासकामांबद्दल निवेदन दिले व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बद्दल खोट्या तक्रारी व खोटी माहिती देत तशा आशयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
भाजपाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे महाविकास आघाडी बद्दल तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी कोणताच निधी सोलापूरच्या विकासासाठी दिला नसल्याचे खोटेनाटे सांगत तशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे पहावयास मिळाल्याचे सांगत याबाबतीत सत्यता जनतेसमोर मांडताना जेव्हा जिल्ह्याला प्रथम दिलीप वळसे-पाटील हे पालकमंत्री म्हणून लाभले तेव्हा त्यांनी ९.८६ कोटीचा निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा साठी दिल्याचे, तसेच त्यानंतर 2020 मध्ये जेव्हा दत्तात्रय भरणे मामा पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच डीपीडीसीच्या बैठकीत २०-२१ साठी ३३.५४ कोटीचा निधी सोलापूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता.
तसेच सध्याला सोलापुरात महानगरपालिकेमध्ये भाजपचीच गेल्या पाच वर्षापासून सत्ता असून देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता परंतु दत्तात्रय भरणे यांनी सर्व नगरसेवकांना समसमान निधी उपलब्ध करून द्या, तसा ठराव पाठवा, मी त्याला मंजुरी देतो असे सांगितले होते परंतु महापालिकेतील भाजपा महापौर सभागृह नेते यांनी साधे बजेट देखील मांडले नाही, नगरसेवकांना समसमान निधीचा ठराव देखील पारित केला नाही – का तर त्याचे श्रेय पालकमंत्री भरणे यांना मिळेल, भाजपाला जनतेसमोर उघडे पडावे लागेल म्हणून….उलट आता हे भाजपाचे नेते पदाधिकारी राज्यपालांकडे जाऊन पालकमंत्र्यांनी शहराला काहीच नाही दिले असे रडगाणे गाताना दिसून येत असून ही बाब नक्कीच निषेधार्थ आहे.
भाजपाचे सध्याचे शहरातले आमदार व माजी मंत्री यांच्या कार्यालयासमोरील रस्ता केवळ झाला नसल्याचे कारण पुढे करत शहरात स्मार्ट सिटीची कामे होत नसल्याचे सांगत राज्यपालांना भेटल्याचे पहावयास मिळाले ही शोकांतिका वाटते. मागील काळात भाजपचीच सत्ता (मनपा मध्ये अजून देखील) असताना स्मार्ट सिटी मधील भाजपाच्या नगरसेवक व मक्तेदार यांच्या कामाची बिले मिळत नाहीत म्हणून भाजपानेच स्मार्ट सिटी कार्यालयासमोर आंदोलन करणे ही शरमेची बाब जनतेला पहावयास मिळाली असून महानगरपालिकेमध्ये स्वतः सत्तेत असून महापौर यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनावर अंकुश ठेवून कामे करायला पाहिजे होती परंतु मक्तेदारांची बिले मिळविण्यासाठी उपोषणाला बसलेले दिसून येत आहेत.
परवाच्या 25 तारखेच्या महापालिका सभा मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहर मध्य साठी 25 कोटीचा निधी महापालिका व पीडब्ल्यूडी ला वितरित केल्याचे सांगत गटनेत्यांनी त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव देखील महापालिकेत मांडल्याचे नमूद केले असून या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी मनपा आयुक्तांना, PWD अधिकाऱ्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच विकास कामांच्या उद्घाटन वेळी नामफलकावर उपमुख्यमंत्री यांचा नामोल्लेख असावा हे देखील विनंती पूर्वक सांगणार असल्याचे म्हटले.
शहरातील भाजपा नेते पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्या बद्दल देखील राज्यपालांकडे विनाकारण खोट्या गोष्टी सांगितल्याची बाब निंदनीय असल्याचे कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी सांगत पालकमंत्री भरणे मामा यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लॉकडाऊन असताना कोरोना च्या गंभीर काळात अनेक हॉस्पिटल चालू करायला लावले, तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विविध हॉस्पिटल येथे दाखल करोना रुग्णांना भेटी दिल्या, त्यांना दिलासा देत राज्य प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मनपा मधील सत्ताधाऱ्यांनी केलेला खोटा आरोप खोडून काढताना सोलापूर शहर जिल्हा सध्या लसीकरणाच्या बाबतीत राज्यात पहिल्या चार मध्ये असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी बोरामणी येथील कार्गो विमानतळासाठी मंजूर केलेला 50 कोटीचा निधी तसेच शहरातील महिला जिल्हा रुग्णालयासाठी दिलेला 14 कोटी निधीची मंजुरी असे जवळपास १०० कोटीचा निधी शहराला दिल्याचे सांगितले.
करोना काळात जेव्हा भाजपाचे नेते पदाधिकारी घरी बसले होते तेव्हा पालक मंत्री स्वतः शहरात फिरत होते. अगदी महापौर ह्या कुटुंबासह रुग्णालयात दाखल होत्या त्याचे देखील भरणे मामा नी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती परंतु आता हेच पदाधिकारी पालकमंत्र्यांवर विनाकारण खोटे आरोप करत आहेत.
२०१७ मध्ये सोलापुरातील जनतेने भाजपाच्या फसव्या आश्वासनावरती विश्वास ठेवत त्यांचे 48 नगरसेवक निवडून दिले परंतु हेच नगरसेवक कोरोना सारख्या भयानक साथीच्या रोगाच्या काळात घरी बसून राहिले हा एक प्रकारे त्यांनी जनतेचा विश्वासघातच केला आहे. गेली जवळपास साडेचार वर्षे मनपा मधील सत्ताधारी भाजपा नेते, पदाधिकारी हे मनपा बजेट असेल वा स्थायी समिती चा विषय, शहरातील रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत सपशेल फेल ठरलेले आहेत.
आता 2022 मध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या साठी पुन्हा एकदा जनतेच्या समोर मतदान मागण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे व त्या वेळेला जनतेने विकास कामांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काहीच नसल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून हे काल राज्यपालांना भेटून आपले अपयश झाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु जनता आता भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नसून सोलापुरातील जनता नक्कीच सत्ता बदल करेल असे वाटते.

















