सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय मामा शिंदे यांनी थकित वीज बिलापोटी वीज वितरण कंपनी शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट करत असल्याची तक्रार मांडली. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आली, शेतकरी जगणार कसे? त्यांच्या अडचणी समजून घ्या अशी मागणी आमदार संजयमामांनी केली. संजयमामांच्या या मागणीला सभागृहातील सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला यावर वीज वितरण कंपनीला त्वरित सूचना कराव्यात अशी मागणी पुढे आली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा विषय केवळ सोलापूर जिल्ह्याचा नाहीतर पुणे जिल्ह्यातही वीज कनेक्शन कट केले गेले आहेत या विषयावर आपण सर्व आमदारांनी मुंबईमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन मागणी करू असे आश्वासन दिले.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची सभा झाली बुधवारी लगेच तिसऱ्या दिवशी पालकमंत्री दत्तामामा भरणे आणि आमदार संजय मामा शिंदे यांनी डीपीसी सदस्य संतोष सुळे यांना सोबत घेऊन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये राज्यात अतिवृष्टी झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विहित वेळेत विज बिल भरता आले नाहीत, सध्या साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू असून त्या मिळणाऱ्या बिलामधून शेतकरी विज बिल भरतील, तोपर्यंत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
















