सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पंढरपुरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग व इतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे स्थापना व उद्घाटन झाले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी आपल्या भाषणात या दोन्ही पालखी मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून यामुळे दळणवळण अगदीच सोपे होणार असल्याचे सांगत वाखरी ते पंढरपूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करत तातडीचे 74 कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा केली.
गडकरी म्हणाले , 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी 7 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचं काम पुढील एक ते सव्वा वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे.
दरम्यान, राज्य सरकार या पालखी मार्गावरील पालखी तळांच्या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार 1248 कोटी खर्च करणार आहे. यामुळे वारकऱ्यांची वारी अजून सोपी होईल. गडकरी म्हणाले , महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्री जाणारे भक्तीमार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे, याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे.
गडकरी म्हणाले, पंढरपूर ही संतांची भूमी, केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील साहित्य आणि कलेत संतांचं मोठं योगदान आहे. या साधूसंतांसाठी पंढरपूर हे सर्वात विशेष स्थान आहे. दरवर्षी येथे चार यात्रा होतात. महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात वारकरी येथे पायी येतात. या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याचं काम मला मिळालं आहे, हे माझं सौभाग्य आहे.
भारतमाला परियोजनेत देशभरातील 50 धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यावर 12070 कोटी रुपये खर्च करुन 673 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. तर बाकी 827 किलोमीटरचं काम सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर पूर्ण केलं जाईल. त्यामुळे आगामी काळात भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथला जाऊ शकतील. मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न जात आहे राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, याचा मला आनंद होतोय, असं गडकरी म्हणाले.

















