सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड मोहम्मद खान पठाण हे सोलापूर दौऱ्यावर आहेत शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नगरसेवक तोफिक शेख शहर कार्याध्यक्ष संतोष पवार अल्पसंख्यांक प्रदेशचे वसीम बुऱ्हाण,शहर अध्यक्ष गफूर शेख हे प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पठाण यांनी यावेळी एमआयएम, वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले. ते म्हणाले, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष केवळ मत विभाजन करणारे पक्ष आहेत ते कुणाच्या सुखा-दुखात येत नाहीत. त्यांना स्थानिक प्रश्नाची काही देणे घेणे नाही, निवडणुका आल्या की यायचे भाषण ठोकायचे आणि युवकांच्या डोक्यात भरवून जायचे. आजपर्यंत यांचे एवढच काम राहिलं आहे. नांदेड मध्ये आम्ही एमआयएम हद्दपार केले. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एमआयएम आणि वंचितची जादू चालली नाही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. एमआयएम खासदार अससोद्दीन ओवेसी यांचे केवळ एकच काम आहे, भारतीय जनता पक्षासाठी रस्ता मोकळा करणे असा आरोप त्यांनी केला.
मागील पाच वर्षात भाजप नेतृत्वाखाली असलेल्या युती सरकारने तिहेरी तलाक, एनआरसी बिल, जम्मू काश्मीरचे 370 कलम, मॉब लिचिंग अशा अनेक मुद्द्यांवर अल्पसंख्यांक समाजाला दहशत मध्ये ठेवले होते, असे असताना 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44 एवढया जागा मिळाल्या परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे अल्पसंख्याक समाज समाधानी आहे, मुस्लिम समाजाचे आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, मंत्री होत आहेत.
सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे बसण्यापेक्षा नागरिकांमध्ये जाऊन पक्षाची ध्येयधोरणे, विचार सांगावेत, युवकांचे मत परिवर्तन करावे, निश्चितच भविष्यात पक्षाला चांगला फायदा होईल. असा विश्वास मोहम्मद खान पठाण यांनी व्यक्त केला.

















