सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावचे ग्रामपंचायत सदस्य बशीर शेख यांनी दिलीप माने यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठापना व कोरोना योद्धा सन्मान असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
दरम्यान दिलीप माने यांचा सत्कार सिलिसिद्ध कोटे ,अमर पाटील ,उस्मान बागवान ,सिद्वेश्वर घोडके ,गणेश माने ,काशिनाथ हरणे ,प्रधान गुरव , सोमनिंग फताटे ,सिराज शेख ,भुताळी घोडके ,गोरख माळी ,राहुल राऊत , चंदू मेजर ,प्रताप हरणे ,सचिन वळसंगे ,लिंबाजी वंजारे ,अमसिद्ध शिवशरण ,दत्ता माने ,बसवराज गाडेकर, अमसिद्ध कोरे ,उमेश राऊत ,सादिक हवालदार ,काशीनाथ नामतुरे ,घोशपाक इनामदार ,नजीर शेख ,जितेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमा मध्ये अनेक कार्यकर्त्यांमधून दिलीप माने यांनी पुन्हा दक्षिण तालुक्याचे नेतृत्व करावे असा सूर पुढे आला.
हाच धागा परत आपल्या भाषणात दिलीप माने यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत माझी चूक झाली, मतदारसंघ सोडायला नको होता, मात्र आता निवडणूक इथूनच लढवणार आणि आमदार होणार अशी थेट घोषणा करून टाकली.
परंतू, सध्या दिलीप माने हे नक्की कोणत्या पक्षात आहेत हेच कोणाला माहित नाही. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मतदारसंघ बदलला मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टच मध्ये असतात,त्यामुळे राष्ट्रवादीत जातील अशीही चर्चा होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांच्याच नावाची चर्चा ऐकण्यास मिळाली मात्र विधान परिषद निवडणूक पुढे गेली आणि दिलीप माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे घोडे अडले.
त्यांनी पुन्हा दक्षिणवर लक्ष केंद्रित केल्याने नक्की कोणता पक्ष असेल हा सुद्धा प्रश्न आहे. माने हे काँग्रेस पक्षाकडून 2009 साली दक्षिणचे आमदार झाले होते, 2014 साली भाजपच्या सुभाष देशमुखांकडून त्यांचा पराभव झाला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत नवख्या असलेल्या बाबा मिस्त्री यांनी चांगली फाईट दिली, तब्बल 56 हजार मते घेऊन बाबा मिस्त्री यांनी काँग्रेसची ताकद दक्षिण मध्ये अजूनही कायम आहे हे सिद्ध केले. त्यामुळे पुन्हा दिलीप माने यांना कॉंग्रेस कडूनच उभे रहावे लागणार असे चित्र दिसत आहे. माने यांनी पुन्हा दक्षिण तालुक्यातून दंड थोपटल्याने दक्षिण मतदारसंघात आता राजकीय चर्चेत ऊत आला आहे.

















