सोलापूर : मार्च महिना सुरू झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये खर्चाचा आढावा व इतर कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची समन्वय सभा बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेतली.
सभेच्या सुरुवातीलाच ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाची योजना असलेल्या घरकुल व महिला बचत गटांना आर्थिक स्वयंपूर्ण करणाऱ्या उमेद अभियानाचा आढावा सुरू होता. या आढाव्या दरम्यान उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांना मात्र वरिष्ठांनी चांगलेच धारेवर धरले, त्यांच्या तालुक्यातील कामकाजावर विभाग प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे, व वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी शेख यांना चांगलेच फैलावर घेतले.
एकूणच घरकुल योजना आणि उमेद अभियानाच्या महिला बचत गटांचे कामकाज पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सर्वच गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागाशी निगडित सर्वात महत्त्वाचे हे दोन विभाग आहेत, गरजूंना घरे आणि महिलांना आर्थिक स्वयपूर्ण करणाऱ्या या योजनांचा वारंवार आढावा घेणे म्हणजे जिल्हा परिषदेचे दुर्दैव आहे.
या दोन विषयांमध्ये प्रत्येकाने झोकून देऊन काम केले पाहिजे, सोलापूर जिल्ह्याला 125 कोटीचे टार्गेट असताना एक तब्बल 160 कोटी कर्ज आपण महिला बचत गटांना उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 25000 बचत गटांमधील 1 लाख 30 हजार महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. 31 मार्चच्या आत जिल्ह्यातील संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे अशी तंबी स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भरली.

















