







सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती
सोलापूर :
सोलापूरच्या दोन देशमुख आमदारांमध्ये कायमच “तू भारी की मी भारी” यावरून कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळायचे. निवडणुका आल्या किंवा वरिष्ठ नेते आले तर तेवढेच वरून वरून ते एकत्र दिसायचे परंतु नंतर एकमेका विरोधात कुरघोड्या असायच्या. पण आता हेच देशमुख आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीपासून एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोलापुरातील आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी मधील राजकीय समीकरणे प्रचंड बदलली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे झाले. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यातच शहर मध्य मधून भाजपचे आमदार म्हणून देवेंद्र कोठे निवडून आले.
आणि त्यानंतर अचानक नरेंद्र काळे यांचे शहराध्यक्ष पद काढून रोहिणी तडवळकर यांच्याकडे देण्यात आले.
बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी विजय देशमुख यांच्याशी हात मिळवणी करत पॅनल उभे केले, तेव्हापासून हे दोन्ही नेते कायम एकत्र दिसत आहेत. एकमेकांच्या घरी जाणे, कार्यालयात जाणे, कार्यक्रमाला जाणे चालू आहे.
मनीष देशमुख यांच्या वाढदिवसाला विजयकुमार देशमुख यांनी स्वतः त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विजयकुमार देशमुख यांचे बरेच कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गेले, असे पहिल्यांदाच घडले असेल नंतर सुभाष देशमुख यांनी दिवाळीचा फराळ कार्यक्रम आयोजित केला. तेव्हाही विजय देशमुख यांचे सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी फराळाला आवर्जून उपस्थिती लावली तसेच सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सामूहिक विवाह सोहळ्याला सुद्धा विजय देशमुख समर्थक कार्यकर्त्यांचा पुढाकार दिसून आला.
एकीकडे विजय देशमुख यांच्यासह त्यांचे समर्थक हे सुभाष देशमुख यांच्या सोबत मनापासून एकत्रित झाले असताना दुसरीकडे सुभाष देशमुख यांचा कार्यकर्त्यांमध्ये मात्र खुचडे राजकारण दिसते.
शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज पूजन ठेवून सर्वांना स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले होते त्यांनी सुभाष देशमुख यांना घरी जाऊन निमंत्रण दिल्याचे समजले. बापूंच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनाही त्यांनी या कार्यक्रमाला बोलावले होते पण नरेंद्र काळे यांना शेवटी नाराज व्हावे लागले. सुभाष देशमुखसह चिरंजीव मनीष देशमुख हे तर आलेच नाहीत पण सुभाष देशमुख यांचा समर्थक एकही कार्यकर्ता या कार्यक्रमाला दिसला नाही हे या दोन देशमुखांच्या मनोमिलनचे दुर्दैव म्हणावे लागेल. बापूंना नरेंद्र यांच्यापेक्षा वडाळ्याच्या काका साठे यांचा कार्यक्रम महत्वाचा वाटला असेल. काळेनी बराच वेळ बापूंची वाट पाहिली.
सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी दोन देशमुख एकत्र गाडीतून अभिवादन करण्यासाठी आले. यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे सोलापुरात वाढते वर्चस्व पाहता स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन देशमुख नेते एकत्रित आलेत का असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
आगामी महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे. दोन्ही देशमुखांवरील नाराज कार्यकर्ते हे गोरे, कल्याणशेट्टी अन् कोठे यांच्या गटात आहेत.
नाराजांमध्ये सुरेश पाटील, नागेश वल्याळ, बिज्जू प्रधाने, शोभा बनशेट्टी, अशोक निंबर्गी, इकडे श्रीनिवास करली, राजेश काळे, राजेश्री चव्हाण असे अनेक जण आहेत.
पण या दोन देशमुखांनी आपल्या मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांना कधी भेटण्याचा प्रयत्न केला आहे का? त्यांना संपर्क केला आहे का? नाराजी दूर करून पुन्हा आपल्या सोबत घेतल्यास त्यांचीच ताकद वाढणार आहे.



















