उमेश पाटलांची भरगच्च पत्रकार परिषद ; दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी ; भीमा मल्टिस्टेट अन् डिसीसीच्या निवडणुकीला विरोध कायम
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी सभापती कल्पना क्षीरसागर, बिज्जू प्रधाने, सुहास कदम, किरण माशाळकर, किशोर पाटील, रामेश्वर माशाळ, सायरा शेख, रियाज शेख, दशरथ कसबे, कुबेर फुलारी उपस्थित होते.
उमेश पाटील यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना भीमा साखर कारखान्याच्या मल्टीस्टेटला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला तीव्र विरोध दर्शवला. जिल्ह्याचे नूतन कार्यकारणी येत्या दोन आठवड्यात करणार असल्याचे सांगताना भविष्यात दादांचे राष्ट्रवादी मजबूत करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
येत्या दोन आठवड्यात सोलापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी करणार असून पदे देताना सामान्य कुटुंबातील धडपणाऱ्या, पक्षाला वेळ देणाऱ्या, झटणाऱ्या, निवडून आणण्याची ताकद आहे आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगत जिह्यातील त्या त्या तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच निवड केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची आहे ती बँक प्रशासकाच्या ताब्यात राहू द्यावी, जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी हे निवडणुका घेऊन आपल्या मुलांना बँकेवर आणण्याचा घाट घातला जात आहे. त्याला आपला विरोध असून सहकार मंत्र्यांना पत्र देऊन जिल्हा बँकेची सुनावणी तातडीने लावावी अशी मागणी करणार आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याचे 22 हजार कुटुंब आणि एक लाख शेतकरी यांचा विषय आहे. मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट घातला असेल तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू, समाधान शेळके यांच्या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सतीश जगताप हे देखील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मल्टीस्टेटला विरोध कायम आहे.
सोलापुरात आमदार नसले तरी राष्ट्रवादीचा मतदार आणि कार्यकर्ता संपलेला नाही. त्यामुळे नव्या उमेदीने आम्ही काम करणार आहोत. सोलापूर मुंबई, सोलापूर तिरुपती, सोलापूर हैदराबाद, दिल्ली अशा शहरात विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी करणार आहोत.
मोहोळचे प्रस्थापित नेतृत्व आता अदखलपात्र झाले आहेत. त्यांच्यावर बोलणे योग्य नाही, त्यांनी केलेली टीका किमान वराती पेक्षा नाही तर त्याला मेळाव्याचे स्वरूप द्यायला हवे होते.
कोणतेही लाभाचे पद घेतले नाही, पक्ष वाढीसाठी पदे घेऊन काम करीत आहे. पक्ष संघटनेच्या बांधणीचा मला अनुभव आहे.
यशवंत माने हे माझ्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होते, प्राजक्ता तनपुरे, संजय बनसोडे हे माझ्या कार्यकारिणीत असणारे अनेक नेते आमदार झाले असल्याचे ते म्हणाले.