सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूरच्या विमानतळावरून चांगली चर्चा झाली. होटगी रोड विमानतळावरून सुरू झालेली चर्चा माळढोक पक्षावर येऊन थांबली. आमदार विजयकुमार देशमुखांनी होटगी रोड विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला मात्र आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळाकडे लक्ष वेधले, पालकमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना समर्थन देत बोरामणी विमानतळ पूर्णत्वाकडे प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
सुरुवातीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरात विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. याचवेळी शेजारी बसलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळ कसे सुरु करता येईल याकडे लक्ष द्यावे असा मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी पालकमंत्रीच्या शेजारी बसलेले खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी ताई नेमके कुठलातरी एक मुद्दा उपस्थित करा अगोदर विमान सेवा सुरू करू द्या त्यानंतर बोरामणी इंटरनॅशनल विमानतळाचे आपण बोलू असे म्हणताच शिंदे यांनी पुन्हा लक्ष वेधताना बोरामणीसाठी जमीन संपादित झाली आहे केवळ 33 हेक्टर वन विभागाच्या जमिनी अडून विमानतळाचे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र पालकमंत्री विखे पाटील यांनी होटगी रोडवरील विमानतळाला चिमणीचा अडथळा आहे त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यात अडचण येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा प्रणिती शिंदे यांनी पुन्हा सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री असताना त्यांनी सोलापूर साठी बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी प्रयत्न केला होता. केवळ वनविभागाच्या जमिनीअडून हे काम थांबले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलताना बोरामणी विमानतळाचे काम वन विभागाच्या 33 हेक्टर जमिनी अडून राहिले आहे त्यांना शासन पर्यायी जमीन देणार आहे मात्र माळढोक पक्षी यामुळे वन विभाग जमीन देत नाही असे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी नक्की किती माळढोक आहेत असा मुद्दा उपस्थित केला.
वन विभागाने केवळ एकच माळढोक पक्षी असल्याचे सांगताच ते एका माळढोक पक्षी अभावी विमानतळ तसेच भूसंपादनाचे काम रखडले आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी आजपर्यंत माळढोक पक्षाला कोणीच पाहिले नाही त्याच्यामुळेच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात आरक्षित क्षेत्रामुळे विकास होऊ शकलेला नाही. आता आपणाला लाकडी माळढोक आणून लावावा लागेल असे मजेशीर सांगताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीला समर्थन देत आता बोरामणी विमानतळासाठीच आपणाला प्रयत्न करावे लागतील असे सांगून विषय थांबवला.


















