अक्कलकोट : समृद्धी महामार्गाप्रमाणे सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ३० एप्रिलनंतर एक मोठे जनआंदोलन उभारु, ग्रीन फील्डचा मोबदला एकरी आहे तर समृद्धी महामार्गाचे मोबदला स्केअर फुटावर आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसायचे नाही, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील सुरत – चेन्नई बाधित शेतकऱ्यांना समृद्धी प्रमाणे भाव मिळावा यासाठी अक्कलकोट येथील सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावर सोमवारी बॅगेहळ्ळी फाट्याजवळ ग्रीन फील्ड संघर्ष समितीच्या वतीने या लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन केले.
यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कासेगाव, तुळजापूर, बार्शी येथील सर्वपक्षीय नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब मोरे आणि स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरत – चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनात उपस्थित राहून रोष प्रकट केला. हे आंदोलन दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले.
या रास्ता रोको आंदोलनमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रीन फील्ड संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, शेतकरी सुरेखा होळीकट्टी,राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनिल बंडगर, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शेतकरी ताराबाई हांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष केंगनाळकर, जिल्हा महिला प्रमुख प्रिया बसवंती, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे,आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रयत क्रांतीचे तालुका प्रमुख नागेश नाईकवाडी, रयत क्रांतीचे महिला तालुका प्रमुख प्रियांका दोड्याळे, सरपंच चिदानंद उण्णद, चंद्रकांत इंगळे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे, सरपंच सिध्दार्थ गायकवाड, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता माडकर, प्रगतशील शेतकरी कालिदास वळसंगे, पंडित पाटील, रयत क्रांती ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजकुमार कोळी, श्रीशैल धनशेट्टी, रामेश्वर बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार, कलय्या स्वामी, सरदार धनशेट्टी, सिध्दाराम अंकलगे, नितीन लोके, शिवराज स्वामी, अमोल वेदपाठक, महेश भोज, विक्रम गाडवे, परमेश्वर गाडवे, श्रीशैल येनगुरे, श्रीशैल भोज, ताजोद्दीन शेख, अंबादास हेडे, सादिक पठाण, दिपक कदम, वाहिद काझी यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















