“घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे तर उघडा मग बघा…”; उमेश पाटलांचा जिल्हा प्रशासनाला इशारा; मोहोळ तालुक्यात पाणी प्रश्न पेटणार
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र देऊन सीना नदीवरील घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे उघडून पाणी सोडण्यास तीव्र असा विरोध केला आहे. अन्यथा आम्हाला सीना नदीच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिलाय.
मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील घाटणे बेरेजद्वारे अडवण्यात आलेले पाणी, मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने सदर घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून ते पाणी नदीद्वारे मोहोळ शहरा करिता आष्टी बंधारा येथे घेऊन जाऊन ते पाणी मोहोळ शहराला पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
परंतु नदीद्वारे पाणी सोडले तर मलिकपेठ, दाईंगडेवाडी, नरखेड, घाटणे, डिकसळ, एकुरके, वाळूज, देगाव, येल्लमवाडी, हिंगणी, मसले चौधरी, बोपले, भैरववाडी, मनगोळी इ. नरखेड परिसरातील गावांमध्ये माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
घाटणे बॅरेज ते आष्टी बंधारा हे 5 किलोमीटर अंतर असून, दरवाजे उघडून पाणी मोकळे सोडून देण्यापेक्षा, बंद पाईपलाईन द्वारे घाटणे बॅरेज इथून उपसा करून मोहोळ शहराला पिण्याकरिता पाणी उपलब्ध होऊ शकते. ही पाईपलाईन आठ दिवसात पूर्ण होऊ शकते.
राजकीय आकसापोटी नरखेडच्या परिसरातील अनेक गावांवर जाणीवपूर्वक अन्याय होण्याची शक्यता आहे. जर नदीद्वारे पाणी सोडले तर त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.





















