सोलापूर : महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच आळंदी येथे पारधी समाजाच्या 200 जणांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चातील 50 जणांचे शिष्टमंडळ नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत तावातावाने आले.
सुरुवातीला प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलावले परंतु पारधी समाज आक्रमक दिसून आला. संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी सोबत आलेल्या सर्वांनाच आत येण्याची विनंती ठोंबरे यांच्याकडे केली कोणीही मध्ये बोलणार नाही या अटीवर सर्वांना आत बोलवण्यात आले.
भोसले यांनी आपल्या सोबत आलेली सर्व निवेदने जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या हातात दिली, आपल्या सर्व मागण्या त्यांनी मांडल्या. सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज सर्व योजनेपासून दुर्लक्षीत आहेत त्यांना दरीत सर्व योजना मिळाव्यात, सोलापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये तीन वर्ष किंवा चार वर्षापर्यंत ज्या अधिकाऱ्याचा कालावधी संपलेला आहे अशा अधिकार्यांच्या त्वरीत बदल्या कराव्यात. सोलापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या कुठल्याही योजना मिळत नसल्यामुळे पारधी समाजाने हा मोर्चा काढल्याचे सांगण्यात आले.
ठोंबरे यांनी शांतपणे सर्व मागण्या ऐकल्या. आळंदी येथे पारधी समाजाचे जे अटक सत्र सुरू आहे त्याप्रकरणी तुमच्या भावना मी शासनाला कळवतो असे सांगून त्यांनी इचलकरंजीला प्रांताधिकारी असताना पारधी समाजासाठी राबवलेल्या उपक्रमाप्रमाणे इथेही तोडगा काढतो असे सांगितले. घरकुलाचा प्रश्न, बेरोजगारांना नोकरीचा प्रश्न, विविध दाखले यांचा प्रश्न एक बैठक लावून सोडवू, त्या बैठकीला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनीषा आव्हाळे याही उपस्थित राहतील. या बैठकीला सर्व समाजातील शिकलेल्या युवकांनी यावे अशा पद्धतीने त्यांनी पद्धतशीरपणे समजून सांगितले. बरेच प्रश्न एकाच बैठकीत सुटणार असतील तर अतिशय चांगले होईल या आनंदी चेहऱ्याने सर्व पारधी समाज हात जोडून जिल्हाधिकारी ठोंबरे यांचा समोरून कार्यालयाच्या बाहेर पडला.




















