सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता दिंडीचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार मंगेश चव्हाण, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेलकांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अधिकारी संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, सुनिल कटकधोंड, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागील सतरा वर्षापासून अविरत ही स्वच्छता दिंडी निघते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. देशात आणि राज्यात स्वच्छता ही चळवळ निर्माण झाली आहे. स्वच्छतेचे बाबत लोक एवढे जागरूक झाले की त्याची प्रचिती आज पंढरपूरमध्ये आली. ही लोक चळवळ झाली त्याचे समाधान आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये दरवर्षी वारकरी संप्रदाय वाढत चालला आहे, त्यामुळे प्रशासनाची ही जबाबदारी वाढत चालली आहे. वारकऱ्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, दिवाबत्ती याचे नियोजन प्रशासनाने केले आहे आज मी पंढरपुरात पाहत आलो आहे, रस्ते पाहिले, मोबाईल टॉयलेट पाहिले त्याचे स्वच्छता दिसून आली हे पाहून समाधान वाटले यावर्षी चांगले नियोजन झाले आहे. त्यामुळे मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, समन्वय मंत्री गिरीश महाजन व तानाजी सावंत यांना धन्यवाद देतो आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनंदन करतो.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना आषाढी वारीमध्ये जिल्हा परिषदेने राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यंदा महिला वारकऱ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. महिला वारकऱ्यांसाठी प्रथमच स्नानगृह उभारण्यात आले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार वारकऱ्यांना एकात्मिक निवारा केंद्र उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभि गायक मोहम्मद अयाज यांच्या आवाजात महाराष्ट्र गीत सादर झाले. सर्व मान्यवरांना वारकरी फेटा घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी मानले.





















