निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही !
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी
सोलापूर : शिवसेनेचे सदस्य प्रवीण तानवडे आणि शिवराज म्हेत्रे यांनी दोन-दोन समित्यांमध्ये सदस्याचे अर्ज दाखल केल्याने निवडणूक होणार का? अशी चिन्हे होती परंतु गटनेत्या रश्मी बागल यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने समित्या सदस्य निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
जिल्हा परिषदेच्या दहा विषय समितीच्या सदस्य पदाची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. अक्कलकोट मध्ये सध्या भाजप विरुद्ध शिवसेना चाललेला सत्ता संघर्ष यामुळे सदस्य निवडीच्या प्रक्रियेत निवडणूक लागण्याची चिन्हे दिसत होती तानवडे आणि मेहत्रे यांनी स्थायी, समाज कल्याण आणि बांधकाम साठी आग्रह धरला होता.
मात्र पृथ्वीराज माने यांच्यासाठी शिवराज मेहत्रे यांनी माघार घेतली तर प्रवीण तानवडे यांना समजूत काढण्यात गटनेत्या रश्मी बागल यशस्वी झाल्या. आपल्या गाडीमध्येच त्यांनी पृथ्वीराज आणि शिवराज यांना घेऊन हे सर्व हॉटेल बालाजी सरोवरकडे रवाना झाले.
दुपारी दोन ची सभा सदस्य संख्या कमी असल्याने तहकूब करण्यात आली. ती सभा दुपारी साडेतीन वाजता ठेवण्यात आली. तेव्हाही सभा सुरू व्हायला वीस मिनिटे उशीर झाला. रश्मी बागल पृथ्वीराज माने शिवराज म्हेत्रे आणि प्रवीण तानवडे यांना सोबत घेऊनच त्या सभागृहात बसल्याचे दिसून आले. दहा समित्याच्या 83 सदस्यांच्या निवडी सभेच्या सचिव स्मिता पाटील यांनी बिनविरोध घोषित केल्या.
निवडी बिनविरोध होताच उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहत तुम्ही सांगितल्याप्रमाणे निधी देताना कोणताही दुजाभाव करणार नाही, समसमान निधी देईन असा शब्द दिला.
निवडी बिनविरोध झाल्यानंतर समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्यावतीने सर्व सदस्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पुन्हा उपाध्यक्ष पवार यांनी आवर्जून शिवसेना गटनेते चरण चवरे यांचा चवरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अतुल पवार यांचा अतुलजी पवार असा उल्लेख करत त्यांना संविधान उद्देशिका घेण्यासाठी निमंत्रित केले.


















