नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम
सोलापूर : सोलापूरकरांनी प्रगतीसाठी विश्वासाने सर्व नगरसेवकांना निवडून दिले आहे. सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला सर्व नगरसेवकांचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले. उद्योगवर्धिनी संस्था आणि केतन वोरा मित्र परिवारातर्फे ५३ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
उद्योगवर्धिनी संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा, उद्योगवर्धिनी संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य आनंद जोशी उपस्थित होते. याप्रसंगी नूतन नगरसेवकांचा शाल, पुस्तक, नॅपकिन बुके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वैभव हत्तुरे, उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर श्री. कोंड्याल म्हणाले, शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळण्याकरिता सर्व नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पाणी, धुळमुक्ती, पर्यावरण, गोशाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध चाळींसह शहरातील नागरिकांना सुविधा, स्मशानभूमी सुधारणा आधी विषयांवर आगामी काळात काम करण्यात येणार आहे. उद्योगवर्धिनी संस्था विशेषतः महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. समाजातील दहा हजार गरजू महिलांना रोजगार देण्याचे कौतुकास्पद काम उद्योगवर्धिनी संस्थेने केले आहे, असेही महापौर कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.
उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन शहरातील १० समस्यांची यादी करावी. पक्षभेद विसरून सर्वांनी सोलापूरच्या विकासासाठी एकत्र येत या १० समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवत काम करावे. अभ्यासिका, वाचनालय, शैक्षणिक साहित्याची मदत, गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सहाय्य, समाज मंदिरे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा या मुद्द्यांना सोलापूर महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे. नगरसेवकांनी नागरिकांसाठी सहज उपलब्ध असावे. आठवड्यातून एक दिवस नागरिकांना भेटण्यासाठीचे ठिकाण आणि वेळ निश्चित करावी, अशी अपेक्षाही चंद्रिका चौहान यांनी याप्रसंगी व्यक्त केली. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवरही नगरसेवकांनी काम करावे, असेही चंद्रिका चौहान याप्रसंगी म्हणाल्या.
भाजपाच्या शहराध्यक्षा आणि नगरसेविका रोहिणी तडवळकर म्हणाल्या, उद्योगवर्धिनी संस्थेने महिलांसाठी केलेले काम मोठे आहे. नगरसेवकांनी शहर विकासासाठीची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. महिलांच्या उन्नतीसाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहनही शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले.
वैष्णवी पवार आणि कांचन श्रीराम यांनी श्लोक सादरीकरण केले. ऍड. गीतांजली चौहान यांनी संस्था परिचय करून दिला. प्रा. उत्तरा बरडे – बचुटे यांनी सूत्रसंचालन तर केतन वोरा यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी उद्योगवर्धिनी संस्थेच्या सदस्या आणि केतन वोरा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


















