श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन
सोलापूर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात कसेगावाच्या शिवारात आगमन झाले. जिल्हा परिषदेने यंदा या पालखी सोहळ्याच्या स्वागताचे योग्य नियोजन केल्याचे पाहायला मिळाले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे प्रदेश नेते शहाजी पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी कवितके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उप अभियंता बीटला, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, उळे गावचे सरपंच अंबिका कोळी, नेताजी खंडागळे, मनोज गुंड, गंगेवाडी सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह इतर मान्यवर व अधिकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले.
या पालखी सोहळय़ात शिस्तीचे व भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळय़ात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळय़ांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी मानाचे अश्व आहे. यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे मुक्कामी रवाना झाली.