सोलापूर : मोहोळ तालुक्यातील तरटगाव इथल्या जमिनीच्या वादातून सामाजिक कार्यकर्ते उत्तम नवघरे यांना शासकीय विश्रामगृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात सिव्हील पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आलेल्या एमएलसी मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता त्यांनीच मारहाण केल्याची आरोप या नोंदीत करण्यात आला आहे. मात्र यामागील सत्य काही वेगळेच असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, तरटगावातील एक शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न उत्तम नवघरे हे करत होते, संबंधित शेतकरी हा ही तक्रार घेऊन प्रकाश वानकर यांच्याकडे आले, त्या शेतीला वानकर यांनी भेट दिली तेव्हा नवघरे यांनी सुद्धा वानकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा तो विषय मिटवण्यासाठी वानकर यांनी पुढाकार घेतला होता. याबाबत उत्तम नवघरे व प्रकाश वानकर यांच्यात बराच वेळा भेटी झाल्या आहेत, नवघरे हे आमच्या घरी सुद्धा येऊन गेले, त्याबाबत नवघरे यांनी बरेच कॉल वडिलांना केल्याचे स्क्रीन शॉट आमच्याकडे आहेत.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हा विषय मिटवण्यासाठी रेस्टहाऊस मध्ये भेटण्याचे ठरले. रेस्ट हाऊस मध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सर्वत्र असतात यावेळी नवघरे यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना काय समजू नये म्हणून त्या व्यक्तीला मुद्दाम बाहेर थांबून चर्चा करण्यासाठी ते एकटे आत आले. यावेळी चर्चा फिस्कटली आणि नंतर नवघरे यांनी आपणाला मारहाण झाल्याचा बनाव केला असे वानकर यांचे म्हणणे आहे.
मुळात उत्तम नवघरे यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संपूर्ण सोलापूरला माहिती आहे. माझे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहित आहे. जर वादच करायचा होता तर कोण कुणाला शासकीय विश्रामगृहावर कशाला बोलवेल, पोलिसांनी चौकशी केली व सीसीटीव्ही तपासली तर सत्य नक्की बाहेर येईल असे सांगत ते म्हणाले, लोकांनी तक्रारी-प्रश्न घेऊन आमच्याकडे येऊ नये का? हे माझ्या वडिलांवर खोटे आरोप असून हा केवळ माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे वानकर म्हणाले.