सोलापूर : अपघातांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्राधान्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वेगमर्यादेसाठी महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून वित्तीय तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूरचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सोलापूर शहरचे पोलीस निरीक्षक व्ही. बी. सिद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता अश्विनी वाडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी आदि उपस्थित होते.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर गतिरोधक, वेगमर्यादेचे व दिशादर्शक सूचना फलक लावावेत, अशा सूचना करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, प्राणांतिक अपघात वाढल्यामुळे विभागांनी बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. महामार्गावरील रस्ता दुभाजक फोडणाऱ्या हॉटेल, ढाबा चालक, नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, अपघातांची आकडेवारी व त्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा संबंधित यंत्रणांनी अभ्यास करावा. हेल्मेट वापरण्यासंबंधी तसेच वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन करावे. अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राच्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे ते म्हणाले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) संदर्भात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील अपघातांची आय रॅड (इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डाटा बेस) ॲपमध्ये माहिती भरण्याचे काम 97 टक्केपर्यंत पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.