दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूप येथे होत असलेल्या संभाव्य एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आमच्या सातबारा वरील चढवलेले भोजे कमी करा यासाठी मागील काही दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे कोणताही निर्णय होत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपली जनावरे आणून बांधली आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेने केले.
यावेळी महादेव कुंभार, मलकारी जोडामोटे, सरस्वती कुंभार, सातव्वा कुंभार, सविता कुंभार, रमेश कुंभार, पद्मावती कुंभार, महेश कुंभार मळसिद्ध कुंभार, कस्तुरा नंदूरे, लक्ष्मीबाई मेंडगुदले यांच्यासह शेकडो शेतकरी यांचा सहभाग होता.
भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला असून आमच्या शेतीच्या उताऱ्यावरील औद्योगिक वसाहतीचे नाव अगोदर कमी करा, अशी मागणी केली. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.
एमआयडीसी आरक्षित क्षेत्र अशी नोंद सातबाऱ्यावर झाली आहे. यामुळे खरेदी-विक्री करताना व बँकेचे कर्ज काढताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच मोबदला न देता व शेतकऱ्यांची संमती नसताना सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे नाव कसे लावले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. हा शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे, अशी त्यांची भावना आहे.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे फोन लावून याविषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांसह प्रहारचे अजित कुलकर्णी व जमीर शेख यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्या गाड्या मागवण्यात आल्या असून जनावरे उचलण्यासाठी अतिक्रमण विभागाचे वाहन बोलावण्यात आले आहे.






















