सोलापूर : सकल जैन समाज अनेक दिवसानंतर रस्त्यावर उतरलेला दिसून आला. समाजाने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जैन धर्मीयांची अतिशय पवित्र असे सिद्धक्षेत्र महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र घोषित केल्याचा झारखंड सरकारचा निषेध नोंदवला.
हा मोर्चा बुधवारी दुपारी श्री आदिनाथ जैन मंदिर पासून सुरु होऊन माणिक चौक, फौजदार चावडी, दत्त चौक, लक्ष्मी मंडई, पंच कट्टा मार्गे जिल्हा परिषद येथील पूनम गेट समोर विसर्जित झाला. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन 20 तीर्थकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु झारखंड सरकारच्या या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य धोक्यात आले असून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालायचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील जैन समाज बांधवानी दिवसभर आपली सर्व प्रकारची आस्थापने, दुकान, ऑफिस, शैक्षणिक संस्था अशा सुमारे 49 संस्था, संघटना, ट्रस्टचा कारभार बंद ठेऊन सोलापूर सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित निषेध मूक मोर्च्यात सहकुटुंब सहभाग नोंदवला.




















