सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला अभियानात नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील. आगामी काळात नदी प्रदूषणामुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे व जनावरांचे आरोग्यमान धोक्यात आले आहे. यासाठी प्रशासनातील प्रमुख घटकांनी या विषयाला प्राधान्य देवून नदी प्रदूषण हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासक धीरज साळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशीला देशमुख – मोहिते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आवाळे, उपवनसंरक्षक धैयशील पाटील, राज्य समन्वयक डॉ. सुमंत पांडे, क्षेत्रीय समन्वयक अधिकारी सर्वश्री आर. पी. मोरे, श्री. जाधवर, श्री. वाडकर, श्री. हरसुरे, अण्णा कदम, नदी समन्वयक सर्वश्री वैजनाथ घोंगडे, रजनीश जोशी, डॉ. अनिल पेठकर, सूर्यकांत बनकर, दिनकर नारायणकर, बाळासाहेब ढाके, विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश आहे. या नद्यांना प्रदूषित करणारी स्थळे निश्चित करा. दोषींना नोटिसा द्याव्यात, असे निर्देश श्री. शंभरकर यांनी यावेळी दिले.
आदिला नदीचा उगम उस्मानाबाद जिल्ह्यातून होत आहे. आदिला नदीचा प्रवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांतून होत आहे. त्यासाठी संबंधित गावांतील नागरिकांचादेखील या मोहिमेत सहभाग आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे श्री. शंभरकर म्हणाले.
बैठकीत समन्वयक अधिकारी यांनी नदीनिहाय नदी संवाद यात्रेचे सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीच्या सदस्यांची मते जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या. नदी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी, त्यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळवण्यासाठी, तसेच काही महत्वाच्या बदलही सूचविले.



















