दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांचे वारसदार म्हणून महाराष्ट्रातील सर्व थोर मंडळीचे, नेत्यांचे प्रेम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांना लाभले . गेल्या ३७ वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतरावदादा पाटील, शरद पवार साहेब, साथी एस.एम जोशी, ना.ग . गोरे, बापूसाहेब काळदाते अशा अनेक नेत्यांचे मार्गदर्शन लाभले . या सर्वांकडून जे जे चांगले ते सर्व स्विकारत जयंतराव पाटील यांनी स्वतःच स्वतःला घडविले . अत्यंत डोळसपणाने आणि दुरदृष्टीने ज्येष्ट नेते शरद पवार साहेबांनी हा हिरा जपला आणि घडविला . पैलु पाडून सत्तेच्या कोंदणात बसविला आणि पक्षाच्या कठीण प्रसंगात हाच हिरा पुढे केला . साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय वाटचाल करणारे जयंतराव पाटील आज साहेबांची सावली बनले आहेत . भारतात उद्योगाला प्राधान्य मिळत नाही म्हणून नाराज होऊन चाललेल्या एलॉन मस्क यांच्या सारख्या उद्योगपतीला सन्मानाने महाराष्ट्रात निमंत्रीत करणे असो किंवा कोयणा आणि चांदोलीच्या धरणग्रस्तांचे सन्मानाने पुनर्वसन करणे असो, जयंतराव पाटील दोन्ही प्रकारची कामे आपली जबाबदारी म्हणून पार पाडतात . एखादा राजकीय नेता आपला देश, आपले राज्य याच्या उन्नतीला आणि अंतिम : जनतेला उत्तरदायी असतो . त्यांच्या हितासाठी झटणे, ही जबाबदारी पार पाडणे म्हणजेच “साहेब ” होणे असते . त्या अर्थाने जयंतराव पाटील यांना ही सध्या जनता आदराने साहेब म्हणू लागली आहे . हेच त्यांच्या तीन तपाच्या कारकिर्दीचे यश आहे .
स्व . यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून शरद पवार साहेबांच्या बरोबर सर्वसामान्य रयतेतील अनेक कार्यकर्त्यांना घडविले . आणि त्यांनी महाराष्ट्रात चव्हाण साहेबांचा विचार पुढे नेला . दिवंगत राजारामबापू पाटील त्यापैकीच एक . महाराष्ट्राच्या स्थापनेच्या काळात काँग्रेस अडचणीत आली असताना चव्हाण साहेबांनी राजारामबापूंना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करून कॉग्रेसला उर्जितावस्था आणण्याची जबाबदारी सोपवली . आणि बापूंनी ” हे काम अवघड आहे पण अशक्य नाही . ” असा कार्यकर्त्यांना विचार देत महाराष्ट्रात काँगेसला १९६२ च्या निवडणुकीत यशाच्या शिखरावर पोहचविले . आता याच कामगिरीला २०१८ – १९ सालच्या राजकीय परिस्थितीशी ताडून पाहीले तर लक्षात येते की २०१४ साली जो भारतीय जनता पक्ष, राज्यात राजकीय स्थैर्य असले पाहीजे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारामुळे सत्तेत येवू शकला होता. त्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच फोडण्याचा प्रयत्न केला . पाच वर्षात महाराष्ट्रातील अनेक घराण्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना पक्षांतर करणे भाग पाडले . आणि नंतर आमच्या समोर कुणी विरोधकच उरलेला नाही, आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार . असे वक्तव्य सुरु केले . त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षात चलबिचल झाली . राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचे सर्वाधिक चटके बसले . तोंडावर असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस कशी सामोरी जाणार अशी शंका अनेक लोक घेत होते . मात्र पवार साहेबांनी जणू याच काळासाठी एक हिरा राखून ठेवला होता . त्याचे नाव जयंतराव पाटील ! . चव्हाण साहेबांनी जसे अडचणीच्या प्रसंगी राजारामबापूंकडे प्रदेशाध्यक्ष सोपविले तसेच पवार साहेबांनी जयंतराव पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवले . जीवाचे रान करून जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला .आपला पक्ष अडचणीत असला तरी आपणच सत्तेवर येणार आहोत असा विश्वास त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केला . गेलेल्यांचा विचार न करता नव्या युवकांना घेऊन मी महाराष्ट्र पुन्हा उभा करीन हा पवार साहेबांचा विश्वास लोकांना अधिक भावला . आणि तोपर्यत सावरून बळकट झालेले पक्ष संघटन निवडणुकांना सामोरे गेले . पुढे महाविकास आघाडीचा इतिहास घडला . मध्यंतरीच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतरही पक्ष फुटला नाही तर एकसंघपणे सर्व आमदार पवार साहेबांच्या बरोबर राहीले . ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली एक सत्व परिक्षाच होती . जी जयंतराव पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षात्वाखाली यशस्वी झाली होती .
पवार साहेबांनी राजकारणात एक कर्तबगार युवा पीढीला आणले आणि त्यांना महाराष्ट्राचे जबाबदार नेते बनविले . या पीढीत होते अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रियाताई सुळे , जयंतराव पाटील, स्व . आर . आर .आबा पाटील, दिलीपराव वळसे पाटील, सुनिल तटकरे, नबाब मलिक हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युवा चेहरा दिला आणि गेल्या २० वर्षात या नेत्यांना अधिक प्रगल्भ घडवत नेतृत्वाची एक फळी उभी केली . या सर्व कर्तबगार नेतृत्वाच्या वाटचालीत जयंतरावांची वाटचाल थोडी आगळी आणि वेगळीच घडली . दिवंगत राजारामबापूंच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही जयंतरावांची प्राथमिकता होती . वाळवा तालुक्यातील मध्यभाग वारणा आणि कृष्णा नदी तालुक्यातून वाहूनही कोरडा राहतो . त्या भागात ५० हजार एकरांवर पाणी वापराचे परवाने राजारामबापूंनी घेऊन ठेवले होते . नळपाणी पुरवठा योजनांचे जाळे निर्माण करून हे ५० हजार एकर क्षेत्र जयंतरावांनी ओलीताखाली आणले आणि आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा केला . ज्येष्ट नेते शरद पवार यांनी त्या काळापासूनच जयंतरावांना जपण्याचे काम केले . त्यांच्या अंगी असणारे गुण हेरून राजारामबापू कारखान्याचे चेअरमन असताना जयंतरावांना राज्य सहकारी साखर संघावर घेऊन अध्यक्ष पद बहाल केले . साखर कारखानदारीत उतरलेल्या नेतृत्वाने शास्त्रोक्त पद्धतीने फायद्याचे गणित मांडले पाहीजे . आणि जगाशी स्पर्धा करून सर्वोत्तम कामगिरी केली पाहीजे म्हणून राज्यातील काही निवडक कारखानदारांना घेऊन पवार साहेबांनी जाणीवपूर्वक जयंतरावांसह काही युवा कारखानदारांना जगातले प्रकल्प अभ्यासाला लावले . पवार साहेब त्या सर्वांना घेऊन परदेश अभ्यास दौर्यावर गेले . जयंतरावांनी त्या सर्व ज्ञानाचा वापर आपल्या कारखानदारीत करून राजारामबापू सह. सा. कारखाना राज्यातील आदर्श साखर कारखाना घडविला . त्याच्या चार शाखा आणि वैज्ञानिक प्रगती पाहण्यासाठी देशभरातून लोक साखराळे येथे येतात . १९९० साली प्रथम आमदार झाल्यानंतर राजारामबापूंचे कार्य पुरे करण्यासाठी जयंतरावांना मंत्री करावे अशी मागणी घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईला पोहचले होते . तेव्हा पवार साहेबांनी त्या शिष्टमंडळाला जयंतरावांना काही काळ उमेदवारी करू द्या . लगेच मंत्री करणे योग्य होणार नाही . पण माझे त्यांचेवर लक्ष राहील . असे आश्वासन दिले . १९९० आणि ९५ या दोन्ही काळात पवार साहेबांनी जयंतराव पाटील यांच्या जाणीवा विकसीत होतील अशा पद्धतीने कामे आणि जबाबदाऱ्या सोपवल्या . ते साखर संघाचे अध्यक्ष असताना गोपीनाथ मुंढे यांनी पुकारलेल्या उस तोडणी कामगारांच्या संपावर मुंढेशी यशस्वी बोलणी कशी करावी याचा मार्ग दाखविला . आणि राज्याच्या हिताचा मार्ग काढला . दक्षिण आफ्रिका, अमेरिका येथे साखर व्यवसायाबाबत सुरू असलेले संशोधन दाखविण्यासाठी पवार साहेबांनी त्यांना नेले . या ९ वर्षामध्ये जयंतराव आपल्याकडून काय शिकले याचे बारकाईने अवलोकन पवार साहेबांनी केले होते . म्हणूनच १९९९ साली लोकशाही आघाडीचे शासन सत्तेवर आले तेव्हा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती युती सरकारच्या कारभारामुळे ढासळली होती . अशा आर्थिक संकटाच्या काळात मंत्रीपदी नवख्याने आले असतानाही जयंतरावांना थेट कॅबिनेट आणि त्यातही अर्थखात्याची जबाबदारी दिली . पवार साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरत तब्बल ९ वर्षे जयंतरावांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला , आणि राज्याची आर्थिक घडी बसविली . ही मुश्कील कामगिरी ते करू शकले याचे कारण पवार साहेबांचा त्यांचेवरील विश्वास !
जबाबदार नेत्यालाच आपल्यापुढे राज्याला प्रगती पथावर घेऊन जाणारी पीढी घडवायची असते . पवार साहेबांनी जयंतरावां सारखे नेते ही महाराष्ट्राची पीढी ठरविली . प्रसंगी जयंतराव कटू निर्णय घेऊ शकतात की नाही आणि कठीण प्रसंगात सुद्धा सर्वांचे ऐकुन घेऊन आपला निर्णय समोरच्या च्या गळी उतरवू शकतात की नाही याची परिक्षा अर्थमंत्री पदाच्या ९ वर्षाच्या काळात वेळेवेळी घेतली गेली . विविध खात्यातील अनावश्यक खर्चाला विरोध, कर्मचाऱ्यांचे संप, विविध संघटनांच्या मागण्यांसाठीची आंदोलने, अनुदानाचे प्रश्न, राज्यावरील वाढते कर्ज आणि व्याज, परतावा, अशा बाबतीत जयंतरावांनी कठोर निर्णय घेऊन दाखविले . आणि त्याच बरोबर राज्याचे उत्पन्न देखील वाढविले . अशा काळात सरकारी कर्मचारी अनुदानाच्या लाभार्थी संघटना यांच्याशी कटुता न आणता समन्वयाने मार्ग काढला . ग्रामीणविकास मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर ग्रामपंचायतीना आर्थिक शिस्त, इमारती, संगणक आणि तंत्रज्ञानयुक्त कारभार आणि स्पर्धात्मक योजनांमध्ये सातत्यही ठेवले . २६ / ११ नंतर आर . आर . आबांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हा पवार साहेबांनी बोलावून ही जबाबदारी जयंतराव पाटील यांच्यावर सोपविली . कसाबचा खटला निर्धोकपणे चालविण्या बरोबर त्याला फासावर पोहचविण्या पर्यंतचा आणि मुंबईसह राज्यातील पोलीसांवरील ताण कमी करण्यापर्यंतची कामगिरी त्यांनी या काळात बजावली . पोलीसांना आधुनिक शस्त्रे, नव्या इमारती, घरे भरती आणि प्रशिक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला . सत्तेत आणि विरोधात असतानाही जयंतरावांनी आपल्या कामगिरीचा आलेख नेहमीच चढता ठेवला आहे . व्यक्तीगत महत्वकांक्षेला महत्व न देता सांधीक कामगिरी आणि जबाबदारी पार पाडत रहायचे हे त्यांना राजारामबापूंच्या कार्यातूनच उमगले आहे . म्हणूनच २०१४ ते १९ या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर बसलेली असताना सुध्दा जयंतरावांनी वेळोवेळी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे . न डगमगता त्यांनी कामगिरी केल्यामुळेच पवार साहेबांनी प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांचेवर सोपविली .
महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना जयंतराव पाटील यांची भुमिका महत्वाची ठरली . राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विभागातील पाणी योजनांना प्राधान्य दिले आहे . उस्मानाबाद येथे झालेल्या एका बैठकीवेळी तिथल्या कार्यकर्त्यानी जयंतराव पाटीलच आमच्या दुष्काळ मुक्तीसाठी कामगिरी बजावू शकतील असा विश्वास व्यक्त केला . कृष्णेचे पाणी मराठवाड्याला पोहचविण्यासाठी त्यांनी प्रामाणीक प्रयत्न चालविले . त्याचवेळी सांगली जिल्हयात विस्तारीत म्हैशाळ योजना राबवून राजारामबापूंचे ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खुप मोठे प्रयत्न केले आहेत . त्यांच्या नेतृत्वा खाली जलसंपदा विभागाने सिंचन आणि जल समृद्धीचे शाश्वत यश मिळविले आहे. ३०६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अशा योजनांमध्ये निर्माण करून सव्वा लाख हेक्टर जमीन सिंचनक्षम बनविली आहे . २७० बांधकामांधीन प्रकल्पांपैकी १०४ पूर्ण करण्याचे नियोजन केले होते . आणि त्यावेळी ३४ पुर्ण झाले होते . १२ धरणांच्या महत्वपूर्ण दुरुस्तीचे काम त्यांनी हाती घेतले होते . प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या धर्तीवर प्रकल्पांना उत्तरदायी बनवून लाभक्षेत्राचे सर्वेक्षण, पाणी पट्टी वसुलीत वाढ, सिंचन क्षमता व प्रत्यक्ष वापरातील तफावत दुर करणे, त्यासाठी ड्रोन, रिमोट सेन्सींग आणि डाटा कलेक्शन करणे त्यांच्या कारकिर्दीत सुरु केले . पुराचे पाणी दुष्काळी भागातील तलाव भरण्यासाठी वापरण्याचे आणि नव्या योजनांद्वारे महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात घेऊन जाण्याचे नियोजन त्यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व भागात पाणी उपलब्ध करून देणे, पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण करणे, महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटक या राज्यांशी समन्वय, सामंजस्य करार आणि पुर संरक्षक भिंती उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते .
जागतिक पातळीवरील एक उद्योगपती एलॉन मस्क यांनी भारतात आपल्याला उद्योग उभारणी साठी सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना व्यक्त केली होती . वास्तवीक ते उद्योग खात्याचे काम होते . पण या विषयात जागतीक पातळीवर आपला देश बदनाम होतोय याची जाणीव असणाऱ्या जयंतरावांनी मस्क यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले . सर्व सोयी सुविधा देण्याचे आश्वासन त्यांना दिले . संपूर्ण भारतात असा एकच व्यक्ती निघाला आणि ते होते जयंतराव पाटील, हे आपण लक्षात घेतले पाहीजे . जबाबदारीची जाणीव असणे म्हणजे हेच असते . ज्यांना आपले राज्य, त्याची प्रतिमा याची चिंता असते असेच नेते तातडीने प्रतिसाद देतात . जयंतरावांनी आपल्यातील जबाबदार नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे . संपूर्ण देशात अशा प्रकारची कामगिरी फक्त पवार साहेबच करू शकले आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या जयंतरावांनी हे कार्य पुढे चालु ठेवले . साहेबांची सावली या माझ्या म्हणण्यालाच पुष्टी मिळते. राजारामबापु पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले नाही. सर्वच बाजुनी परिपूर्ण असलेले, अनुभव संपन्न जयंतराव पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझ्या सारख्या लाखोंची भावना आहे . स्व . यशवंतराव चव्हाण साहेब आणि श्री . शरद पवार साहेब यांच्याच चौफेर आणि सर्वांगीण कार्याची चुणुक जयंतराव पाटील साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतून संपूर्ण देशाला दिसून येईल. इतके प्रगल्भ नेतृत्व जयंतराव पाटील साहेबांचे आहे . पवार साहेबांच्या एका भगिनीचे सासर वाळवा तालुका आहे . त्या न्यायाने जयंतराव पाटील साहेब पवार साहेबांचे भाचेच आहेत . पवार साहेबांचीच सावली असलेले जयंतराव पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत, हीच त्या अल्लाहतालाकडे नम्र दुवाँ, प्रार्थना. याच त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !






















