सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळील हरणा नदीवरील पुलासाठी शासनाकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या समस्येचे निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करून पुलाची मागणी केली होती .त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ७ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावची लोकसंख्या जवळपास ९ हजाराच्या आसपास आहे. या गावाजवळून १०० ते २०० मीटर अंतरावर हरणी नदी आहे. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे लोकवस्ती आहे. तसेच शेतकऱ्यांची शेतीसुद्धा आहे. नदीच्या पलीकडे शेतकरी आणि नागरिकांना अलीकडे येता येत नव्हते. आणि मुस्ती गावच्या लोकांना नदीच्या पलीकडे जाता येत नव्हते. यासाठी असलेल्या एकमेव बंधाऱ्याचाच वापर होत होता. परंतु ऐन पावसाळ्यात या धोकादायक बंधाऱ्यावरूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागायचा. यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन हरणी नदीवर पुलाची मागणी केली होती.
परंतु त्याला खूप वेळ लागत होता .मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील तसेच उपसरपंच रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची भेट घेऊन त्यांना पुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. जिल्हाप्रमुख काळजे यांनीसुद्धा नागरिकांची समस्या आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आणि वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी लावून धरली होती. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्ती गावाजवळील हरणी नदीवर ७५ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी सुमारे ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर मुस्ती ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाप्रमुख काळजे यांचे आभार मानण्यात आले. आता लवकरच या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.




















