सोलापूर : राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची निवड झाली असून पंचायतराज दिनी दिल्ली येथे या चार गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी माहिती दिली.
शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने ९ संकल्पना अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायती करीता राष्ट्रीय पंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली. भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने तयार केलेल्या तज्ञ गटाने पंचायत राज संस्थांसाठी ही ध्येये साध्य करण्यासाठी संकल्पनात्मक दृष्टिकोनाचा अंगीकार करणेवावत सूचित केले असून यासाठी नऊ संकल्पना (थिम्स)/विषय निश्चित करून दिल्या होत्या. (1) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव (2) आरोग्यदायी गाव (3) बालस्नेही गाव (4) जलसमृद्ध गाव (5) स्वच्छ व हरित गाव (6) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव (7) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव (8) सुशासन युक्त गाव (9) लिंग समभाव पोषक गाव या संकल्पना होत्या.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व ग्रामपंचायतचे प्रशिक्षण सत्र जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करून पूर्वतयारी करून घेतली होती गट विकास अधिकारी मार्फत जिल्हास्तरावर प्रथम तीन ग्रामपंचायती काढण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सर्वोत्कृष्ट काम केलेल्या 9 ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर शिफारस करण्यात आली, राज्यस्तरीय समितीने तपासणी अंतर्गत केंद्रीय स्तरावर 9 ग्रामपंचायत पैकी चार ग्रामपंचायतीची निवड केली आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे, माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर, मोहोळ तालुक्यातील अर्धनारी व पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे सरपंच आणि ग्रामसेवकांना 24 एप्रिल रोजी होणाऱ्या पंचायत राज दिनी कार्यक्रमास दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आली आहे.
सीईओ स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ही अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय स्तरावर नऊ ग्रामपंचायतीना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या चार ग्रामपंचायतीचा समावेश असून किमान नऊ पैकी दोन ग्रामपंचायत या सोलापूर जिल्ह्यातील याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


















