![]() |
डॉ. गौरी बाचल |
1. होमिओपॅथी म्हणजे काय ?
होमिओपॅथी ही एक वैद्यकीय शाखा आहे है शास्त्र सिमिलिया सिमिलीबस क्युरेटर म्हणजेच “समः समं शमयती ” या तत्वावर आधारित आहे. होमिओपॅथीचा शब्दशः अर्थ घेतला तर होमिओ म्हणजे सारखे व पॅथॉस म्हणजे रोग किंवा रोग लक्षणे. होमिओपॅथी मध्ये होमिओपॅथिक औषधांची लक्षणे (गुणधर्म ) व रुग्णात असलेली रोगसदृश्य लक्षणे ही एकत्रितपणे एकमेकांना पूरक असतील तर तशी होमिओपॅथिक औषधे रुग्णांना देण्यात येतात.
2. होमिओपॅथीचा शोध कसा व कुठे लागला ?
डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांना होमिओपॅथी शास्त्राचे जनक मानले जाते त्यांचा जन्म जर्मनी या ठिकाणी 10 एप्रिल 1755 मध्ये झाला म्हणूनच 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो.
1779 मध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांनी डॉक्टरेट ऑफ मेडिसिन म्हणजेच एमडी ही पदवी एलर्गिन विद्यापीठातून प्राप्त केली. दोन वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायानंतर त्यांना असे दिसून आले की, आजार हा संपूर्णपणे बरा होत नाही म्हणून त्यांनी रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास चालू केला.
डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा विद्याव्यासंग हा फार मोठा होता त्यांना निरनिराळ्या 14 भाषांचे ज्ञान अवगत होते. कुलेन मटेरिया मेडिका या पुस्तकाचे भाषांतर करत असताना त्यांना असे आढळले की 1790 मध्ये प्राध्यापक विल्यम कुलेन यांनी असे म्हटले की पेरुव्हियनची साल (जी आताची क्वीनीन म्हणून ओळखली जाते ) ही हिवताप म्हणजेच मलेरिया बरा करू शकते. कारण ती चवीने कडू आहे पण हे विधान डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांना रुचले नाही त्यांनी यावर प्रयोग करायचा ठरवला व दररोज चार ग्रॅम ते सिंकोनाचे साल घेऊ लागले. थोड्या दिवसात त्यांना काही लक्षणे दिसू लागलीत ही सर्व लक्षणे म्हणजेच हात पाय थंड पडणे, थकवा येणे, ग्लानी येणे, छातीत धडधड होणे, अंग अतिशय थरथर कापणे तसेच मुदतीचा ताप ही सर्व लक्षणे हिवतापाच्या रुग्णांमध्ये असतात पण जेव्हा डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांनी ही सिंकोनाची मात्रा घेण्याची बंद केली तेव्हा त्यांची लक्षणे बंद झालीत. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की कोणतेही औषध तेव्हाच पेशंटला लागू होते, जेव्हा त्यांच्यातील आजाराची लक्षणे व औषधाची लक्षणे एकसारखी असतात होमिओपॅथी मध्ये समानता हे प्रमुख तत्व आहे.
3. या औषधांचा परिणाम कसा होतो ?
होमिओपॅथी ही उपचार पद्धती अतिशय सुरक्षित व विश्वसनीय आहे. साधारणपणे 200 वर्षापासून चा इतिहास असलेली ही औषध प्रणाली आहे. निरोगी मनुष्यावर या औषधाचे सिद्धीकरण झालेले आहे. ही औषधे पूर्णतः सुरक्षित असतात आजाराचे मूळ कारण शोधून आजार संपूर्णपणे नष्ट करण्याचे काम होमिओपॅथी करत असते. होमिओपॅथिक औषधे घेतल्यानंतर रुग्णांमध्ये अनेक सकारात्मक बदल जाणवतात. होमिओपॅथिक औषध प्रणाली ही मानसिक व शारीरिक लक्षणे पाहून एकत्रितपणे काम करणारे एकमेव वैद्यकीय शास्त्र आहे.
4. ही औषधे ब्लड प्रेशर किंवा मधुमेह रुग्णांना चालतात का ?
– होय! ही औषधे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा मधुमेह आहे तसेच गरोदर स्त्रियांना व वयोवृद्ध व्यक्तीने सुद्धा या औषध प्रणालीचा अवलंब केला तर काहीही हरकत नाही. यासोबतच ज्यांना थायरॉईडचे कोणतेही त्रास असतील किंवा फिट वगैरे येत असेल तेव्हा त्यांनी त्यांचे ऍलोपॅथिक औषधांसोबत होमिओपॅथिक औषधे घेतली तरीही चालतात. होमिओपॅथिक औषधांचे कोणते दुष्परिणाम होत नाहीत.
5. लहान मुले वयस्कर व्यक्तींना या औषधी चा फायदा होतो का ?
होमिओपॅथी मध्ये सगळ्याच वयोगटातील व्यक्ती या होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करत आहेत कारण वयोवृद्ध व्यक्तींना खूप ऍलोपॅथिक औषधे घ्यायची म्हणले की त्यांच्या मनात “नको ही औषधे “अशी भावना असते. कारण आजाराचा त्रास त्यांना होत असतो व एकाच वेळी चार चार गोळ्या घ्यायचं म्हणलं की त्यांना ते त्यांना अवघड वाटते व लहान मुले एखादे औषध किंवा गोळी घ्यायचं म्हणलं की घरभर आई-वडिलांना फिरवत असतात कारण कडू औषधे मुलांना आवडत नाही. होमिओपॅथिक औषधे मुले आवडीने खातात. कारण ही औषधे चवीला गोड असतात.
6. नागरिकांमध्ये असा समज आहे की होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा गुण येण्यास उशीर लागतो ?
जनमाणसामध्ये खरं तर हा गैरसमज आहे कारण जसा तुमचा आजार आहे तसा उपचारांचा कालावधी असतो. साधारणपणे लहान आजार जसे की सर्दी, खोकला, ताप, एलर्जीक विकार हे तीन ते चार दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होत असतात पण दमा, मुळव्याध, संधिवात, आमवात व त्वचेचे विकार हे बरे होण्यास थोडासा वेळ लागतो पण उपचार व्यवस्थित घेतले की त्यामध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम दिसायला लागतो.
7. सगळ्यांना एकच औषध असते का?
– नाही ॥ या उपचार पद्धतीमध्ये असलेल्या गोळ्या या साबुदाण्यासारख्या दिसतात व दिसायलाही ते एकसारखे असल्यामुळे नागरिकांमध्ये असा गैरसमज होऊ शकतो. पण या गोळ्यामध्ये आम्ही द्रव स्वरूपातील औषधी घालत असतो व अशा औषध रुपी गोळ्या या रुग्णांना देण्यात येतात. होमिओपॅथीमध्ये Individualisation हा सिद्धांत आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत त्यामुळे एकच औषध सगळ्यांना लागू होत नाही. होमिओपॅथी मध्ये व्यक्तीचा शारीरिक, मानसिक तसेच त्या व्यक्तीची आवड -निवड,प्रकृती उष्ण थंड आयुष्यात घडलेल्या पूर्व घटना, वजन, उंची या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला जातो. योग्य औषध दिल्याने रोगाचे समूळ उच्चाटन होते. औषधांची मात्रा ही आजाराच्या तीव्रतेवर ठरवली जाते. होमिओपॅथी मध्ये असाध्य व जुनाट रोगावर यशस्वीपणे उपचार होतात. आज विश्वामध्ये प्रामुख्याने भारत देशामध्ये होमिओपॅथिक औषध प्रणालीचा अवलंब करणाऱ्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे हे सर्व औषध प्रणालीच्या परिणामकतेमुळे सिद्ध झाले आहे.
8. सगळ्या आजारावर होमिओपॅथिक उपचार पद्धती लागू होते का ?
होय! जवळपास सगळ्याच आजारांवर होमिओपॅथिक उपचार पद्धती यशस्वीपणे कार्य करत आहे पण प्रत्येक पॅथीमध्ये स्कोप आणि लिमिटेशन्स असतात तसेच ते होमिओपॅथी मध्ये सुद्धा आहेत.
9. होमिओपॅथिक औषधे घेताना पथ्य खूप पाळावे लागतात का ?
होमिओपॅथिक औषधे घेताना औषधांची परिणामकता कमी होऊ नये याकरिता रुग्णांनी आपल्या आहारातील उग्र वासाचे काही घटक टाळावे लागतात जसे की कच्चा कांदा, कच्चा लसूण व कॉफी हे शक्यतो टाळावे. होमिओपॅथी मध्ये आजार तर दूर होतोच पण त्याचबरोबर व्यक्तीच्या शरीराची प्रतिकारशक्ती ही वाढते तसेच मनही चैतन्यशील होऊन उत्साह वाढतो.
आपणास कोणतेही शारीरिक व्याधी असल्यास मनामध्ये होमिओपॅथी औषध प्रणालीचा पूर्वग्रह दूषित न ठेवता या औषध प्रणालीचा जरूर अवलंब करावा.
डॉ. सौ. गौरी बाचल
होमिओपॅथीक कन्सल्टंट आणि आहारतज्ञ समर्थ होमिओपॅथीक क्लिनिक सोलापूर 9860087627

















