सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची व विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी अखेर गुरुवारी दुपारी पाडण्यात आली. पोलिसांनी कारखान्याच्या चारी दिशेला कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही.
त्यामुळे शुक्रवारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांची त्यांना समर्थन देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये विशेष करून भाजपच्या सुद्धा काही ज्येष्ठ नेत्यांनी काडादी याची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले.
माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, दक्षिणचे नेते सुरेश हसापूरे काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील,भाजपचे जेष्ठ माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक सुभाष शेजवाळ, काँग्रेस नेते अशोक निम्बर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले, शहराध्यक्ष चेतन नरोटे, शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हततुरे, माजी नगरसेवक तौफिक हत्तूरे, दत्तू बंदपट्टे, बसवराज म्हेत्रे, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे राजू चव्हाण, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपडला यांच्यासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी, मार्केट यार्डातील व्यापारी, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने काडादी यांची भेट घेऊन आपले समर्थन दिले. दिलीप माने यांनी तर उद्या विमानसेवा सुरू करा आम्ही बुकिंग करायला तयार आहोत असे सांगून चिमणी पाडल्या प्रकरणी प्रशासनावर नाराज व्यक्त केली.
महेश कोठे यांनी थेट नाव न घेता आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर तोफ डागली. चिमणी पाडण्यामागे भाजपचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे यांनी हा कारखाना पुन्हा कसा उभा राहील यासाठी आम्ही धर्मराज काडादी यांच्या कायम पाठीशी राहू असे आश्वासन दिले.
विजयकुमार हत्तुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बोलणे काडादी यांच्याशी करून दिले. काँग्रेस पक्ष हा काडादी यांच्या पाठीशी असून आज त्यांनी आज चिमणी पाडली उद्या आपण त्यांना पाडू असे आश्वासन दिल्याचे सांगितले.
अशोक निम्बर्गी यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सोलापुरात कुठला आतंकवादी हल्ला होता का? एवढा बंदोबस्त लावला होता. आता चिमणी पाडलात तुमचे अभिनंदन ! परंतु आता कधी विमानसेवा सुरू करणार? किती विमान उडणार? किती लोकांच्या हाताला रोजगार मिळणार? किती उद्योग सोलापुरात आणणार? किती शेतकऱ्यांचा उध्वस्त झालेला संसार उभा करणार? हे सुद्धा आम्हाला पाहिजे आहे.


















