सोलापूर – येथील चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा आणि कुर्बान हुसेन यांचा त्याग सोलापूरवासीय कधीही विसरू शकत नाहीत, तसेच त्यांनी केलेली क्रांती अन् भारत स्वतंत्र होण्यासाठी दाखवलेले शौर्य कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे चार हुतात्मा स्मारक येथे या चार हुतात्म्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेचा फलक लावण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना देण्यात आले. या निवेदनाला आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी कार्यवाही करू’, असे आश्वासन समितीला दिले.
या वेळी माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे, तसेच संदीप ढगे, मनीष दायमा, यश क्षीरसागर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, येथील चार हुतात्मा स्मारक परिसरात याविषयीचा मजकूर लिहिलेला नाही. सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथूनही पुष्कळ नागरिक येत असतात. विविध भागांतून येणारे नागरिक या चार हुतात्म्यांच्या इतिहासाविषयी अनभिज्ञ रहातात. त्यांनाही सोलापूर येथील चार हुतात्म्यांच्या स्मारकाविषयी माहिती मिळाल्यास अभिमान वाटेल. सोलापूर येथील चार हुतात्मा हेे सोलापूर सिद्धेश्वर नगरीचे वैशिष्ट्य आहे.
स्वातंत्र्यापूर्वीच वर्ष १९३० मध्ये सोलापूर महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लॉ घोषित केले आणि या चार हुतात्म्यांना खोट्या आरोपाखाली १२ जानेवारी १९३१ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यामुळे या चारही हुतात्म्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या क्रांतीचा इतिहास आणि त्यांनी केलेला पराक्रम सर्वांच्या लक्षात यावा, यासाठी हा फलक लावण्यात यावा.


















