सोलापूर : सर्वसमावेशक,सर्वजन हितकारक विकासासाठी सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल.फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेने पावन आणि पुरोगामी झालेल्या महाराष्ट्राला जातीचे नाही, तर ‘नीती’चे राज्य बनवण्याचे काम केवळ बसपाच करू शकते. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत यामुळे यंदा बसपाचे ४० नगरसेवक निवडून येतील.असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केला.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्यासह प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी अशोक अगवणे, बलभीम कांबळे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद बनसोड, हुलगेश चलवादी, शहर अध्यक्ष देवा उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.प्रेमनाथ सोनावणे, कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव योगेश गायकवाड, शहर सचिव मिझा शेख, प्रविण कांबळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सोलापुर महानगर पालिकेअंतर्गत ‘सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय’ या उद्दिष्ट प्राप्तीसाठी बसपा उत्तम पर्याय आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शोषित, पीडित, उपेक्षितांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, बसपा सत्तेत आली तर सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील. बसपाला त्यामुळे राज्यभरात जातीचे नाही, तर ‘नीती’चे लोक तयार करायचे आहे. आणि याच चांगल्या नितीच्या लोकांमुळे समाज परिर्वतन होण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाईल.
अशात सर्वजनांसाठी बसपा एकमेव पर्याय आहे.सर्वांनी बहन मायावतीजींच्या नेतृत्वात बसपाच्या झेंड्याखाली एकत्रित आले, तर सर्व प्रश्न सुटतील.आता पक्षाची ताकद सत्ताधार्यांना दाखवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकांमधून ती ताकद सत्ताधार्यांना दिसेलच.पंरतु, समाज बांधवांच्या न्याय हक्काचा लढा बसपा लढणार आहे. ओबीसी, एससी, एसटीच्या आरक्षणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी बसपा मागे हटणार नाही.



















