सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सासरे (सख्खे मामा) नागनाथ स्वामी यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील चाकूर या राहत्या गावात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे स्वामी कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.
अशात सर्व कुटुंबियांना दिलीप स्वामी यांनी सावरले. ते सध्या चाकुर याठिकाणी आपल्या परिवारासह थांबून आहेत. याच दरम्यान त्यांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना आणि शिक्षक चाकूरला गेले साहेबांचे सांत्वन केल्यानंतर चर्चेतून एक विषय समोर आला. राज्य शासनाने कोरोना काळात बंद असलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण न झालेले शिक्षण याचा विचार करून संपूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र हा निर्णय घेताना शाळेची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 5 अशी ठेवण्यात आली तसा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी काढला. सध्या सोलापुरात उन्हाचा पारा वाढल्याने मार्चमध्येच तापमान 42 अंशावर गेले आहे. दुपारची शाळा यात शिक्षक विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शाळेची वेळ बदलावी अशी मागणी चर्चेतून पुढे आली.
शिक्षण व आरोग्य बाबत संवेदनशील असणाऱ्या दिलीप स्वामी यांनी तातडीने या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून शाळेची वेळ सकाळी साडेसात ते बारा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी आदेश काढत शाळेची वेळ ही सकाळी साडेसात ते दुपारी बारा अशी बदल केली आहे.
घरामध्ये मामांच्या निधनामुळे संपूर्ण स्वामी कुटुंबीय दुःखात असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा त्यांच्या कामातील संवेदनशीलता दिसून आली.
विशेष म्हणजे स्वर्गीय नागनाथ स्वामी हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक होते. आणि त्यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांबाबत घेतलेला हा निर्णय स्वर्गीय स्वामींना एकप्रकारची श्रद्धांजलीच ठरली आहे.


















