सोलापूर : तुफानी वादळ वारे गारपीटीसह रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या वादळी वाऱ्यात कासेगाव परिसरातील घरांचे आणि शेतात उभ्या असलेल्या बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीच्या पावसाने चिखलात घातला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
रविवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसराला वादळी वारे अन गारपिटीच्या पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्यांचे खांब जागोजागी तुटले, त्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा जागोजागी जमिनीवर आणि शेताच्या परिसरात लोळत असल्याचे दिसून आले.
या वादळी वारे अन् गारपिटीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपून काढले त्यात कासेगाव परिसरातील काही घरावरील पत्रे उडून गेले. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बिरोबा वस्ती परिसराला बसला. त्यात बिरोबा वस्ती वरील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने असंख्य प्रपंच उघड्यावर आले. विद्युत पोल जागोजागी तुटून पडले त्यातच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने त्यात ही विद्युत पुरवठा करणारे यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा परिसर रविवारी रात्री अंध:कारमय झाला. या पावसात जनावरांचा चारा आणि गोट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसात भिजत असलेली आपले प्रापंचिक सामान गोळा करण्यात येईल अनेकांना मोठी कसरत करावी लागली तर काही जणांनी आज सकाळी आपल्या साहित्याची जुळवाजुळव करून जणू काल रात्री काही घडलंच नाही अशा भावनेतून नव्या उभारीने गोळा केलेले पत्रे अन् वासे एकत्रित करून पुन्हा उभारणीस प्रारंभ केल्याचे चित्र आज सकाळी दिसून आले.
रविवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीच्या पावसात द्राक्ष बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. महेश सावंत आणि अण्णा चौगुले यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून बिरोबा वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वयंपाकघरावरील पत्रे उडाल्याचे शिक्षक राजशेखर बुरकुले यांनी सांगितले.
या परिसरात विजेचे डेपो, खांब तुटून पडल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यास दोन-चार दिवसांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले आहे.




























