सोलापूर शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसंत विहार, यश नगर भाग 2 तसेच बाळे परिसर या भागातून नव्याने होणारे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे ट्रॅकचा मार्ग जाणार आहे. त्यामुळे त्याबाबतीत रेल्वे मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांची झोप उडाली आहे.
आपले कष्टाचे बनवलेले घर आता पडणार या भीतीने लोकांची रात्रीची झोपच उडाल्याने अनेक जण घाबरलेल्या भयभीत अवस्थेत आहेत. या लोकांच्या मनात निर्माण झालेले संभ्रम आणि शंका दूर करण्यासाठी रविवारी वसंत विहार इथल्या गार्डनमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, किरण पवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख आणि उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी रेल्वे मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाची बैठक लावून यावर काही तोडगा काढता येतो का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





















