सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हावे आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुमठे इथल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.
हजारोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील राजकीय सर्वपक्षीय राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी आमदार आडम मास्तर यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था सभेच्या स्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. होम मैदानावर सभेसाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांसाठी नाष्टाची सोय करण्यात आली होती.
मोर्चाच्या दर्शन स्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आले आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असून तुम्हारे साथ किलोमीटर शेतकरी चालवण्यात आहेत या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
दरम्यान काडादी म्हणाले, सोलापूरच्या विमानसेवेमध्ये केवळ सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हा एकच अडथळा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याला 35 अडथळे इतर आहेत परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. बोरामणी येथे पर्यायी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना जाणीवपूर्वक कारखान्याला त्रास दिला जातोय तो त्रास कमी व्हावा आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





















