सोलापूर ,दि. 25 – काही कारणामुळे अनेकांचे पालकत्व हरवले आहे. अशा काही विद्यार्थ्यांना मायेचा आधार देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नामदेवराव भालशंकर गौरव समितीने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.
नामदेवराव भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन आणि सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने इंदिरा सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी बोलत ते होते. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी रुक्मिणी भालशंकर, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष शहा, माजी सरपंच पंडित खारे, बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे व रमेश लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, नानासाहेब भालशंकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सुपुत्र माजी पोलीस उपायुक्त आणि महाराष्ट्र विद्यार्थी पालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब दैठणकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक दिलपाक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका सीमा सरवदे, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कारासाठी बहुजन आवाज न्यूज चॅनेलचे उपसंपादक विजयकुमार लोंढे आणि लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नारायण घंटे, माता रमाई आदर्श माता पुरस्कारासाठी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी नूतन कसबेकर , राजर्षी शाहू महाराज युवा उद्योजक पुरस्कारासाठी धानेश्वरी ट्रेडिंग अँड सेल्सचे चंद्रकांत नागणसुरे, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी विश्वभूषण विद्यालयातील प्रवीण पाटील आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी लालबहादूर शास्त्री प्रशालेतील वासंती पाटील यांचा समावेश आहे.
त्यानंतर रुक्मणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, भावनिकतेपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाचे असून ती समाजोउपयोगी प्रत्यक्ष उपक्रमातून कृतीतून करणे या सामाजिक बांधिलकीतून हा आदर्श उपक्रम आम्ही राबवित आहोत. प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मोठमोठ्या यशाचे सूत्रे ही वेगवेगळी असली तरी त्यात परिश्रम हाच गुण कायम असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत कौशल्य व मूल्येही आवश्यक आहेत असे विचार मांडले. सत्कारमूर्तींच्यावतीने माजी पोलीस आयुक्त आबासाहेब दैठणकर आणि सीमा सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव यांचीही भाषणे झाली. या समारंभाचे सूत्रसंचालन विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले तर प्रा. युवराज भोसले यांनी आभार मानले.
हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल जानराव, प्रकाश साळवे, धनाजी धिमधिमे, मल्लिकार्जुन कांबळे, दाऊत आतार, अभिजीत भंडारे, संदीप निस्ताने, दत्तात्रय शिंदे, विष्णू लादे, कैलास माने, सत्यवान पाचकुडवे ,विनोद वर, सदानंद कोळी यांनी परिश्रम घेतले.


















