सोलापूर : राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येऊन जवळपास अडीच वर्षे झाली आहेत मात्र या अडीच वर्षात सोलापूर जिल्ह्याचा चौथ्यांदा पालकमंत्री बदलण्याची वेळ राष्ट्रवादीवर आलेले आहेत इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूरचे पालकमंत्री पद काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय भरणे यांच्या जागेवर आता राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निश्चित केल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करतील अशी माहिती समोर आली आहे.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असल्याचे दिसत आहे. सोलापुरात काँग्रेस शिवसेना भाजप यांच्यासह विविध स्तरातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना विरोध होत आहे.
पालकमंत्र्यांनी या विषयी प्रसारमाध्यम अथवा सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी बसून चर्चा केली नाही किंवा हा विषय समजून सांगितला नाही. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न आणखी पेटला. दोन दिवसांपूर्वी शहरातील तृतीयपंथीयांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना बाय बाय केले होते.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उजनी धरणातील पाण्याचा प्रश्न निश्चितच राष्ट्रवादीला अडचणीत आणणारा आहे. याचा विचार करून सोलापुरातील काही नेत्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली भरणे मामा यांच्या अनेक तक्रारी पवारांसमोर मांडल्या.
आंबेडकर जयंती मध्ये आंबेडकरी नेत्यांमध्ये दोन गट पडले असताना पालकमंत्र्यांनी केवळ एकाच गटाच्या मिरवणुकीत येऊन भेट दिली त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये तसेच समाजामध्ये पालकमंत्र्यांची वाईट प्रतिमा निर्माण झाली. जयंती उत्सवाच्या काळात पालकमंत्र्यांवर तोंडसुख घेण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीमधून निधी देताना पालकमंत्री भरणे यांनी राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक कार्यकर्त्यांचा विचार केला नसल्याचा आरोप कायमच होत आला आहे. जे अजून पक्षात आले नाही त्यांचं विनाकारण महत्व भरणे मामाने वाढवलं. पक्षाच्या शहर व जिल्ह्याची स्वतंत्र बैठक नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही. अशा वारंवार तक्रारी करण्यात आल्या.
दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरून जर हटवले तर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना मंत्री करून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री पदाची जबाबदारी सोपवावे अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मधून पुढे येत होती. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय मामा शिंदे यांची जिल्ह्यावरील पकड पाहता निश्चितच त्याचा पक्षाला फायदा होईल आणि पुन्हा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची झालेली पीछेहाट भरून काढता येईल अशीही चर्चा होती.
मात्र पक्षाने कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री जवळजवळ निश्चित केल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री बदलणार असल्याचे पुढे येत असल्याने धनगर समाजाची भूमिका काय असणार याकडे ही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


















