सोलापूर : रान, तिथं पशू-पक्षी हे निसर्ग चित्र सर्वत्र असतं. जिथे वन्यजीवांचा प्रमाण कमी असतं तिथं के वाढीस लागावा म्हणून शासनाने आरक्षित केलेल्या वन परिसरात रानटी पशुपक्ष्यांची साखळी जतन करण्याचे काम शासन करीत असते. गंगेवाडी आणि नान्नज अभयारण्य परिसरात या साखळीतील काळवीटांबरोबरच रानडुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या प्राण्यांमुळे गंगेवाडी, नान्नज पंचक्रोशीत पिकांचे नुकसान होत असून या दुष्टचक्रात शेतीतील पिकांबरोबरच शेतकरीही महासंकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री चांगला प्रकाश असतो. या प्रकाशात पाणवठ्यावर आलेल्या प्राणी, पक्ष्यांची गणना करणे सोपे जाते. ही बाब लक्षात घेऊन, मे रोजी रात्रीपासून वन्यजीव व पक्ष्यांच्या गणनेस प्रारंभ झाला ती गणना मंगळवारी पहाटेपर्यंत झाली. ही गणना सोयीकृत व्हावी, याकरिता वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींची ही मदत घेण्यात आली.
नान्नज अभयारण्य परिसरात १८ ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांजवळ निरीक्षण केले. तिथे वॉच टॉवर,लपणगृह यांची व्यवस्था करण्यात आली होती. अभयारण्यात विविध भागात वॉच टॉवर उभारण्यात आले होते. टॉवरवर बसून वन्यजीवप्रेमींनी प्राणी व पक्ष्यांची गणना केली. यासाठी त्यांना नोंदवही देण्यात आली होती. या नोंदवहीतील नोंदीतून पुढे आलेल्या धक्कादायक आकडेवारीत सर्वात जास्त काळविटांची संख्या ३७४ तर त्यापाठोपाठ रानडुक्कर संख्या २२० नोंदवली गेली आहे. या रानडुक्करांच्या वाढत्या टोळ्या शेतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत असल्याची भीती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
…………..
रान डुकरांच्या त्रासामुळे भुईमूगसह अनेक पिके गायब
दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या नान्नज आणि गंगेवाडी अभयारण्यानंतर सोलापूर जिल्ह्याची हद्द संपते. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या या अभयारण्य परिसरातील शेतकरी कालपर्यंत रब्बी ज्वारीबरोबर खरीप हंगामात भुईमूग, मका यासारखी अनेक पिके घेत होते, आजमितीला भुईमूग पेरणीच्या पहिल्या रात्री शेंगदाणे वेचून खाणाऱ्या डुक्करांमुळे भुईमूगासह अनेक पिकांची पेरणी अन् लागवड लोप पावत चालली आहे.
…………………..
रान डुक्कर आले कुठून ?
कधीकाळी वनविभागाच्या अभयारण्यात हरीण- काळवीट, लांडगा, ससा, खोकड, मुंगूस, रानमांजर,
मोर, सायाळ, घोरपड, कोल्हा, तरस असे वन्य प्राणी आढळायचे, आता नोंदवहीत नीलगायींचीही नोंद झालीय.विदर्भात या निलगायी पिकांच्या सर्वात मोठ्या नुकसानकारी म्हणून गणल्या जातात. आपल्याकडील वनविभागाच्या क्षेत्रात डुक्कर आले कोठून ? या प्रश्नाचं मिळणारं उत्तर मजेशीर आहे.
………….
डुकरांच्या पाठीमागे आहे मोठे अर्थकारण
सोलापूर तुळजापूर रस्त्यावर गेल्या दोन दशकापूर्वी एका सूत मिल परिसरात डुक्कर आणि भरून चाललेला टेम्पो पलटी झाला होता. त्यावेळी अपघात ग्रस्त टेम्पोतून आपला जीव बचावून पळालेल्या शहरी डुकरांनी रानात आश्रय घेतल्याने त्यांच्याकडे आज रानडुक्कर म्हणून पाहिले जाते. पुढील काळात रान डुक्करांचे मांस खाणाऱ्या माणसांनी रानावनात छोटी पिल्ले सोडून जायची आणखी मोठी झाल्यावर पकडून न्यायची असं चक्र सुरू केलं. या चक्रात त्या वर्गाचं अर्थकारण लपलेले असलेतरी त्यात सामान्यांची शेती आणि शेतकरी भरडला जातोय.
…………………
रानडुकरांचा होऊ शकतो ; मानवी जीविताला धोका
शेतात पिकाची पेरणी वा लागवड केल्यानंतर त्याची राखण करणारा शेतकऱ्याने हरिण काळविटांना हाकलले तर ते कळपासह पळून जातात मात्र रानडुक्कर कधी कधी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येतात. रानडुकर शेतात पाळलेल्या कुत्र्यांनाही चावा घेतात, त्याचा मानवी जीविताला धोका होऊ शकतो, अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
………………….
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची ; कोणी घेत नाही दाद वा फिर्याद
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे हरिण काळविट अथवा रानडुक्कर नुकसान करतात त्यावेळी वन विभागाचे अधिकारी वा कर्मचारी त्याची दाद ना फिर्याद अशा अविर्भावात वावरत असल्याची भावना शेतकर्यांतून व्यक्त केली जाते. वनविभागाचे अधिकारी त्यापुढे जाऊन, रानडुक्कर आम्ही पाळले नसल्याचेही सांगतात. वन्यजीव नोंदवहीत रानडुक्करांची संख्या २२० नोंदविली गेलेली असली तरी वास्तवात ही संख्या फार मोठी असल्याचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
……………….
रानडुक्कर अन् हरीणांमुळे गंगेवाडी, नान्नज अभयारण्य परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीतील पिकांबरोबरच शेतकरीही महासंकटात सापडला असून शासनाने गंगेवाडी, नान्नज अभयारण्य वन्यजीवांच्या नोंदवहीतील नोंदीकडे ‘डोळस’ पणे पाहून शेतकरी वर्गाला या महासंकटाच्या गर्तेतून वर काढावं, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

















