सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत
सोलापूर : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि वेळेचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संध्याकाळच्या भाजीपाल्याच्या लिलावाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सभापती दिलीप माने, संचालक सुरेश हसापुरे, संचालक अविनाश मार्तंडे, संचालक सुभाष पाटोळे, संचालक प्रथमेश पाटील, नागण्णा बनसोडे मुस्ताक चौधरी, जफार चांदा यांच्यासह बाजार समितीतील व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिलीप माने यांनी स्वतः लिलाव काढत आलेल्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला.
ते म्हणाले, यापुढे ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा घेतले जाणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार असून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढेल, शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होईल आणि माल वाया जाण्याचे प्रमाणही कमी होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, शेतकरी बांधव, आडते व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.